मीठ (क्षार) हे खनिज असून, त्याच्या वापराने शेतीतील उत्पादन वाढत असल्याचे मत अनेक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मांडत आहेत. मात्र, त्यापासून फायद्याऐवजी दीर्घकालीन नुकसान व जमिनीच्या सुपीकतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. या संबंधी हा संशोधनात्मक आढावा. पूर्वार्ध मीठ हा अन्नाला रुची यावी व खाद्यपदार्थाचा स्वाद वाढावा यांसाठी प्राचीन काळापासून मनुष्य वापरीत असलेला व प्राण्यांच्या आरोग्यास आवश्यक असलेला एक सुपरिचित पदार्थ. - मिठाला शास्त्रीय भाषेत सोडियम क्लोराइड (NaCl) असे म्हणतात. सोडियम हायड्रॉक्साइड व हायड्रोक्लोरिक आम्ल यांमध्ये रासायनिक विक्रिद्वारे ते बनते. सोडियमाचे हे सर्वांत महत्त्वाचे संयुग आहे.
खनिजयुक्त झरे, खारी सरोवरे, समुद्राचे पाणी यांत विरघळलेल्या स्वरूपात, तसेच सैंधव या खनिज स्वरुपात मीठ निसर्गात आढळते. भारतामध्ये मिठाचे ७५ टक्के उत्पादन हे सागरी पाण्यापासून होत असले तरी जागतिक मीठ उत्पादन मुख्यतः भूमीवरील खाऱ्या पाण्यापासून (उदा. मृत समुद्र) होते. खारट चव असलेले व मिठाला पर्याय होऊ शकेल, अशा ऑर्निथिलटॉरीन व तीन अन्य संयुगांचा शोध जपान येथील हिरोशीमा विद्यापीठातील तीन शास्त्रज्ञांनी घेतला आहे. त्यात सोडियम नाही. शेतीसाठी मीठ अतिशय हानिकारक असल्याचे अनेक वर्षांपासून झालेल्या संशोधनातून सिद्ध झालेले आहे. कोणतेही रसायन हे आपल्या मूळ स्वरुपात कार्यरत होत नसते. ते कार्यरत होताना त्याचे विघटन होत असते. मिठाच्या विघटनानंतर तयार होणारी आयन्स (Na+ आणि Cl- ) ही जमीन तसेच पिकांसाठी हानीकारक ठरतात. त्यांच्यामुळे वनस्पतींवर- अजैविक, भौतिक ताण येतात. जमिनीमध्ये उपलब्ध सोडियम क्लोराईड, मैग्नेशिअम आणि कैल्शिअम सल्फेटस् व बायकार्बोनेटस् या सारख्या क्षारांमुळे वनस्पतींवर निर्माण होणारया ताणाला क्षारांचा ताण (सॉल्ट स्ट्रेस) म्हणतात. भारतातील क्षारपड जमिनींचे राज्यनिहाय क्षेत्र : भारतामध्ये सर्वाधिक क्षारपड क्षेत्र हे गुजरातमध्ये (२२,२२००० हेक्टर) असून, त्या खालोखाल उत्तरे प्रदेशात (१३,६८,९६० हेक्टर) आहे. महाराष्ट्रातील क्षारपड क्षेत्र हे ६,०६,७५९ हेक्टर असून, त्यातील सलाईन सॉईल १,७७,०९३ हेक्टर, तर अल्कली सॉईल ४,२२,६७० हेक्टर आहे. मिठाच्या शेतीत वापरामुळे होणारे दुष्परिणाम ः
जमिनीची पाणी ग्रहण शक्ती कमी होते. मातीचे ओस्मोटिक पोटेन्सिअल वाढल्यामुळे झाडांना पाणी शोषण्यासाठी अधिक ऊर्जा वापरावी लागते. क्षारयुक्त पाण्यामुळे वनस्पती खुरट्या राहतात, पाने जाड होऊन त्यांचा आकार लहान राहतो, पाने पानांच्या, फळांच्या पेशीसमूहाचा काही भाग नष्ट होऊन आकार बदलतो. क्षारांचे प्रमाण अति उच्च असल्यास मातीत पाणी असूनही ते झाडांना शोषता येत नाही. झाड वाळून जाते. सोडियम व क्लोरीन आयन्सचे प्रमाण जास्त असल्यास पोटॅशियम (पालाश), कैल्शियम व नायट्रोजन (नत्र) ही अन्नद्रव्ये शोषता येत नाहीत. याला रसायनशास्त्रात ‘अंटागोनिस्ट इफेक्ट’ असे संबोधतात. जमिनीमध्ये असणारे सोडियम आयन्स मातीच्या रचनेत बदल घडवतात. मातीतील कॅल्शिअम व मॅग्नेशिअमची जागा सोडियम घेतो. त्यामुळे माती कठीण होऊन तिला तडे जातात. यात झाडांच्या मुळांना इजा होते. मातीची पाणी झिरपण्याची शक्ती कमी होते. सोडियम आयन्सचे प्रमाण वाढल्यास झाडातील पोटॅशिअम आयन्सचे प्रमाण कमी होते. पोटॅशिअम हे फळांच्या वाढीसाठी व गुणवत्तेसाठी आवश्यक असते. जमिनीतील क्षाराच्या वाढत्या प्रमाणामुळे बियाणे उगवण क्षमतेवरही परिणाम होत असल्याचे आढळले आहे. तसेच वनस्पतीच्या चयापचयाशी निगडित सर्व प्रक्रियाही विचलित होतात. क्षारांमुळे हरितद्रव्याला (क्लोरोप्लास्ट) हानी पोचल्यामुळे अन्न बनविण्याची प्रक्रिया कमी होते. पानगळ तसेच झाडांच्या मृतासाठी जबाबदार असणाऱ्या अब्सेसिक आम्लाचे प्रमाण वाढते. वनस्पतीतील सर्व हार्मोन्सचे संतुलन ढासळते. संशोधनांचा थोडक्यात आढावा ः
क्षारांच्या वाढत्या प्रमाणामुळे झाडांवर होणाऱ्या दुष्परिणामांबाबतचे हजारो संशोधन लेख उपलब्ध आहेत. मात्र, मिठाचा वापर केल्याने जमीन किंवा झाडांना फायदा झाल्याचा एकही संशोधन लेख प्रस्तुत लेखकाला आढळला नाही. क्षारांच्या दुष्परिणामांबाबतचे काही संशोधने (उदाहरणादाखल) वनस्पतीला ताण पडला असता निर्माण होणारे ‘प्रोलिन’; क्षारयुक्त परिस्थितीमुळे वनस्पतीमध्ये आढळून आले (सिंग व सहकारी, नवी दिल्ली, २०१४). क्षारयुक्त परिस्थितींमध्ये ‘कर्ण खट्टा’ या संत्र्याच्या खुंटातील उपलब्ध पाणी व अन्न बनविण्याच्या प्रक्रियेत कमरता नोंदवली गेली. (शर्मा व सहकारी, २०११). क्षारांमुळे झाडांची उंची, खोडाची जाडी व पानांची संख्या कमी झाल्याचे मुरकुटे व सहकाऱ्यांना (२००६) आढळले. क्षारांच्या वाढत्या प्रमाणामुळे खजुराच्या झाडाची पाने, खोड, शेंडा व मुळांची वाढ व्यवस्थित झाली नाही. (रमोलीया व पांडे, गुजरात, २०१०) आंबा उगवण क्षमता, झाडांची उंची, मुळांचा विकास व झाड जगण्याच्या प्रमाणात क्षारांमुळे बदल होऊन आंबा फळपिकाच्या उत्पन्नावर वाईट परिमाण झाला. (वरू आणि बारड, गुजरात, २०१०). क्षारांचे प्रमाण वाढल्यास ‘कुरुक्कन’ जातीच्या आंब्यांमध्ये मर जास्त झाल्याचे श्रीवास्तव व त्यांच्या सहकाऱ्यांना (२००९) आढळले. आवळ्याची उगवणक्षमता, झाडाची वाढ व उंची, खोडाची जाडी कमी झाल्याचे व झाडांची मर क्षारांच्या वाढत्या प्रमाणामुळे वाढल्याचे राव व सिंग (२००६) यांनी सिद्ध केले. असेच निष्कर्ष प्रसाद व सहकाऱ्यांना (१९९१) फैजाबाद, उत्तर प्रदेश येथील संशोधनातून मिळाले होते. फळझाडांवरील क्षारांचे दुष्परिणाम ः अन्य पिकांच्या तुलनेमध्ये फळपिके जास्त काटक असतात. मात्र, क्षारांमुळे फळझाडांवरही दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. कर्नाल (हरियाना) येथील सेन्ट्रल सॉईल सॅलिनीटी रिसर्च इन्स्टिट्यूट (२०१२) नुसार, पंजाबमध्ये संत्रावर्गीय फळपिके, उत्तर प्रदेशमध्ये आंबा व पेरू, राजस्थान व गुजरात मध्ये सर्व कोरडवाहू फळपिके व केळी तसेच महाराष्ट्र व आंध्र प्रदेशमध्ये द्राक्ष फळपिकांना क्षारांमुळे सर्वांत जास्त फटका बसलेला आहे. संपर्क ः डॉ. विनायक शिंदे- पाटील, 9422221120 (लेखक डॉ. शिंदे पाटील हे विषयातील अभ्यासक असून, डॉ. वांद्रे या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे संशोधन सहयोगी आहेत.)