कंदकुजव्या रोगाचा प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. झाडाला झालेल्या जखमा, रोगट झाडाचे अवशेष, संसर्गीत हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत ही रोगप्रसार होतो. उष्ण दमट वातावरण, सततचा पाऊस, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक असतात. केळी पिकावर विविध कीड आणि रोगांचा सतत प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे उत्पादकता सातत्याने घटत आहे. कंदकूज किंवा पोंगासड हा केळीवरील महत्त्वाचा जिवाणूजन्य रोग आहे. हा रोग पेक्टोबॅक्टेरियम कॅरोटोवोरम् या जिवाणूमुळे होतो. लक्षणे ः
रोगाचा प्रादुर्भाव पीक वाढीच्या कोणत्याही अवस्थेत होऊ शकतो. मात्र, सुरुवातीचे १ ते ३ महिन्याचे पीक रोगास मोठ्या प्रमाणात बळी पडते. कंदासोबत कोवळ्या मुनव्यावरही रोगाची लक्षणे आढळतात. कंदाचा वरील भाग कुजून झाडाचे पोषण व्यवस्थितरीत्या होत नाही. पाने अचानक वाळून जमिनीकडे लोंबू लागतात. प्रादुर्भावग्रस्त कंदांना खूप कमी मुळे फुटतात. मुळांचा टोकाकडील भाग काळा पडून संपूर्ण मुळे कुजतात. झाडाचा आधार नाहीसा झाल्यामुळे, हलक्या धक्क्याने झाडे कोसळतात. झाड उपटण्याचा प्रयत्न केल्यास फक्त झाडच हातात येते. कंद जमिनीतच राहतात. कंद कापून पाहिल्यास, तपकिरी रंगाचा झालेला असतो. त्यात पोकळ्या निर्माण होतात. ग्रॅंड नैन जातीच्या झाडांच्या खोडांना तडा गेलेला आढळतो. खोडाचा आतील भाग कुजतो. रोगाच्या अतितीव्र अवस्थेत झाडाचा पोंगा जळून जातो. अशा झाडांना घाण वास येतो. उशिरा प्रादुर्भाव झाल्यास, झाडाची योग्य निसवण होत नाही. घड आणि केळी फळ लहान आकाराचे होतात. प्राथमिक प्रसार रोगट कंदापासून होतो. झाडाला झालेल्या जखमा, रोगट झाडाचे अवशेष, संसर्गीत हत्यारे, रोगग्रस्त बागेतील चिखल व त्यातून झिरपणारे पाणी यांच्यामार्फत ही रोगप्रसार होतो. उष्ण दमट वातावरण, सततचा पाऊस, चिबड, पाण्याचा निचरा न होणारी जमीन हे घटक रोगाच्या वाढीस पोषक असतात. अर्धवट कुजलेल्या शेणखताचा वापर केल्यास प्रादुर्भाव जास्त वाढतो. लागवडीपूर्वी उन्हाळी खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. लागवडीसाठी निरोगी कंद वापरावेत. कॉपर ऑक्सीक्लोराईड (०.४ टक्के) ४ ग्रॅम अधिक स्ट्रॅप्टोमायसीन* (३०० पीपीएम) ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात ३० मिनिटे बुडवावीत. चांगले कुजलेले शेणखत १० किलो प्रतिझाड वापरावे. लागवडीच्या वेळी जमिनीत प्रतिझाड ब्लिचिंग भुकटी ६ ग्रॅम द्यावी. एक महिन्याच्या अंतराने पुन्हा हीच प्रक्रिया करावी. रोगट झाडे कंदासह उपटून नष्ट करावीत. रोगग्रस्त झाडाचे अवशेष बागेबाहेर काढून बाग स्वच्छ ठेवावी. योग्य प्रमाणात पाणी देऊन बाग नेहमी वाफसा स्थितीत ठेवावी. अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. रोगग्रस्त बागेत पुन्हा केळी लागवड करू नये. पिकाची फेरपालट करावी. संपर्क ः सतिश माने, ९२८४३७५५४५, ०२५७/२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित फळ (केळी) सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)