सध्या काही संत्रा बागांना पूर्ण ताण बसून आंबिया बहाराची फुलधारणा होताना दिसत आहे. काही बागांत ताणाची शेवटची अवस्था आहे.
पूर्ण ताण बसलेल्या बागेमध्ये बहार फुटण्याकरिता ताण तोडताना हलकेपाणी दिले जाते. असे पाणी देण्यापूर्वी प्रत्येक झाडाला नत्र ६०० ग्रॅम अधिक स्फुरद ४०० ग्रॅम अधिक पालाश ४०० ग्रॅम आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाणी पाळीमध्ये भरपूर पाणी द्यावे. खते देताना झाडाच्या खोडापासून २ ते २.५ फूट अंतरावर १ फूट रुंदीचा गोल करंडा खोदावा. यामध्ये वरील सर्व खते द्यावीत. ती मातीने झाकून घ्यावीत. ताण सोडल्यानंतर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. झाडांमध्ये फुलधारणेच्या वेळी कोणतीही आंतरमशागतीची कामे करू नयेत. याचा फुलधारणेवर विपरीत परिणाम होऊन फुले गळतात. आळे मोडल्यास दुरुस्ती करून ओलीत करावे. ठिबक सिंचन संच असल्यास १ ते ४ वर्षांच्या झाडांना ७ ते ३० लिटर, ५ ते ७ वर्षांच्या झाडांना ४४ ते ७२ लिटर आणि ८ वर्षांवरील झाडांना ८२ ते १०२ लिटर प्रतिदिवस जमिनीनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन नसल्यास दुहेरी आळे पद्धतीने ८ ते १० दिवसांच्या अंतराने ओलीत करावे. आळ्यामध्ये गवत, तणस, कुटाराचा ५ ते १० सेंटिमीटर थर देऊन आच्छादन करावे. आंबिया बहराच्या वेळी जिबरेलिक आम्ल १ ग्रॅम अधिक युरिया १ किलो प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. यामुळे आंबिया बहार चांगल्याप्रकारे येतो. रोपवाटिकेमध्ये खुंटावर केलेल्या बडिंगचे निरीक्षण करावे. ज्या खुंटावर बडिंग जमलेले नाही, अशा ठिकाणी पुन्हा बडिंग करावे. बडिंग फुटलेल्या खुंटावर इथिआन २ मिलि प्रतिलिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. बागेला पाणी दिल्याबरोबर ताण तुटतो. नवीन पालवी येण्यास सुरुवात होते. याच वेळी सिट्रस सायलाची पिल्ले पानांतून रस शोषण करतात. नवतीच्या पानांची गळती होऊन फांद्या सुकतात. फळधारणेवर अनिष्ट परिणाम होतो. या किडीद्वारे ग्रीनिंग आणि शेंडेमर रोगाचा प्रसार होतो. जर या किडीचे वेळीच नियंत्रण केले नाही तर झाडावरील फुले आणि फळे गळून पडतात. या किडीमुळे १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. सायला किडीच्या नियंत्रणासाठी, नवीन नवतीवर फवारणी प्रतिलिटर पाणी डायमिथोएट २ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड ०.५ मिली. पुढील फवारणी १० दिवसांनंतर कीटकनाशक बदलून करावी. रासायनिक कीटकनाशकाची फवारणी झाडांना फुले आल्यावर शक्यतोवर टाळावी. रासायनिक कीटकनाशकाच्या फवारणीमुळे परागीकरण करणाऱ्या मधमाश्या आणि काही कीटक मारले जातात. फुलधारणेच्या अगोदर निंबोळी अर्क किंवा कडूनिंब आधारीत किटकनाशक ॲझाडिरेक्टिन (१००० पीपीएम) २ ते ३ मि.लि. प्रति लिटर या प्रमाणे फवारणी केल्यास काही प्रमाणात वरील किडीचा बंदोबस्त करण्यासाठी मदत होते. खोडकीड किंवा इंडरबेला किंवा साल खाणारी अळी
या अळीच्या नियंत्रणासाठी, अळीने खोडाला पाडलेल्या छिद्रावरून जाळे काढावे. या छिद्रामध्ये इंजेक्शनच्या मदतीने डायक्लोरव्हास ५ मिलि प्रतिलिटर पाणी हे द्रावण सोडावे. त्यानंतर त्या द्रावणात बुडवलेला कापसाचा बोळ्याने छिद्र बंद करावे. यासाठी ओली माती किंवा पेट्रोल वापरू नये. संत्रा झाडाच्या बुंध्यामधून डिंकाचा स्त्राव सुरू असल्यास, तो पटाशीने खरवडून ती जागा पोटॅशियम परमँग्नेट द्रावणाने (१० ग्रॅम पोटॅशिअम परमॅंग्नेट प्रति लिटर पाणी) धुवावी. झाडाच्या बुंध्यावर दोन फुटांपर्यंत बोर्डो पेस्ट लावावी. (बोर्डो पेस्ट तयार करण्याकरिता मोरचुद १ किलो व चुना १ किलो प्रत्येक ५ लिटर पाण्यात वेगवेगळे रात्रभर भिजत ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी दोन्ही मिश्रणे एकत्र करून पेस्ट तयार करावी.) संपर्कः डॉ. सुरेंद्र रा. पाटील, ९८८१७३५३५३ (फळ शास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)