
पुणे : देशाची आणि शेतीची प्रगती होत असताना दुसऱ्या बाजूला माती, पाणी आणि मानवी आरोग्यामध्ये प्रदूषण वाढले आहे. हे जर बदलायचे असेल तर जमीन सुपीकता आणि त्यासाठी देशी गोपालनाची जोड देण्याची आवश्यक आहे, असे मत कोल्हापुरातील कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी व्यक्त केले.
‘सकाळ अॅग्रोवन’ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित केलेल्या गोधन प्रदर्शनाचा समारोप रविवारी (ता. २९) काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या उपस्थित झाला. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे आदी उपस्थित होते.
काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, की देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. आपली आर्थिक, भौतिक, बौद्धिक सुधारणा किती झाली हे कळले. देश स्वतंत्र झाल्यानंतर देशात अन्नधान्याची टंचाई खूपच भेडसावत होती. झाल्यावर उपाय म्हणून नवनवीन प्रकल्प देशात आले, नवनवीन प्रयोग करत असताना देश समृद्ध होताना आपण पाहत आहे. तेलधान्य, कडधान्य, फळामध्ये सर्व बाबतीत अधिक उत्पादन घेत विकास दर वाढवत आहोत. विकासदर वाढवत असताना फळ, दूध, भाजीपाल्यामध्ये समृद्ध होत असताना दुसऱ्या बाजूला काही दुप्षरिणाम समोर आले आहेत. या सर्व विकासाचे श्रेय घेत असताना दुष्परिणामाची जबाबदारी आपणाला घ्यावी लागेल.
विकास होत असताना जैवविविधतेचे खूप नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कीटक, पक्षी, वनस्पतींचे खूप मोठे नुकसान झाले आहे. गेल्या ७५ वर्षांच्या कालावधीत घट झाली आहे. माणसाची शारीरिक क्षमता कमी झाली आहे. त्यातून आरोग्याचे दुप्षरिणाम पुढे आले आहे. येत्या २०५० पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत कर्करोगाचे रुग्ण दिसतील, असे शास्त्रज्ञाने म्हटले आहे. त्यातच २५ टक्के कुपोषित आहे. अन्नासोबत जो काही घटक पोटात जात आहे. त्यातून अनेक दुप्षरिणाम झाले आहे. जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे.
माती मेली तर सर्व काही जाईल. माती ही पुनरुज्जीवित करण्याचे काम करते. मात्र सध्या मातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणीच काम करत नाही. देशी गाईमध्ये उपकारमूल्य आहेत. याची सर्व माहिती कृषी महाविद्यालयाच्या केंद्रावर लावली आहे. राहुरी कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या हे पुणे कृषी महाविद्यालयाला ‘सकाळ अॅग्रोवन’ने चांगलाच हातभार लावला आहे. येथे देशी गाईवर संशोधन होत असताना देशी गाईंच्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रचार होत आहे, असे ही काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले, की जमीन सुपीकतेसाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. त्यासाठी विद्यापीठ सर्व दृष्टीने मार्गदर्शनाचे काम करत आहे. एकात्मिक शेती पद्धती हीच आता उपयुक्त ठरणार आहे. त्यादृष्टीने शेतीला पूरक उद्योगाची जोड त्याचबरोबरीने पीक विविधतेवर लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेती आणि पशुपालनाचे नियोजन करावे लागेल. कार्यक्रमात डॉ. धीरज कणखरे यांनी प्रास्ताविक केले. तर सुनील अडागळे यांनी आभार मानले.
दापोलीतही प्रशिक्षण व प्रात्यक्षिक प्रकल्पाचे नियोजन :
गोधन प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी सकाळी भेट दिली. याप्रसंगी प्रदर्शनातील देशी गाईच्या विविध जाती, दूध प्रक्रिया, बायोगॅस, शेण व गोमूत्रापासून बनविलेल्या खतनिर्मिती प्रक्रिया प्रकल्पाची माहिती घेतली. याच पद्धतीने दापोली कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन विभागात प्रशिक्षण व प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. जेणेकरून कोकणातील युवक, पशुपालक, महिला बचत गटांना पूरक उद्योगनिर्मितीला प्रोत्साहन मिळेल, असा विद्यापीठाचा प्रयत्न आहे, असेही डॉ. सावंत म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.