जनावरांमध्ये विविध प्रकारचे आजार अाढळतात. यामध्ये काही चयापचायाचे म्हणजेच मेटाबोलिक आजार असतात; पण बरेचसे आजार मात्र संसर्गजन्य असतात. चायापचयाचे आजार चारा-पाण्याचे योग्य व्यवस्थापान करून दूर करता येतात. काही अाजारांमध्ये प्रतिबंधात्मक लसीकरण करणे अावश्यक असते.
ल स म्हणजे जैविक पद्धतीने विशिष्ट आजाराच्या रोगजंतूंपासून किंवा तशाच प्रकारच्या जंतूंच्या पेशींपासून कृत्रिमरीत्या तयार केले जाणारे द्रावण अाहे. हे द्रावण कृत्रिमरीत्या जनावराला देण्याच्या क्रियेला लसीकरण म्हणतात. लसीतील जंतूंवर प्रयोगशाळेत काही प्रक्रिया केलेल्या असतात. यामुळे त्या जंतूंची रोग निर्माण करायची क्षमता नाहीशी केली जाते किंवा त्यांना मारले जाते. अशी निरुपद्रवी जंतूंची लस जनावरांना दिल्यानंतर त्या जनावरांमध्ये त्या ठराविक रोगासाठी प्रतिकारशक्ति निर्माण होत असते.
जेव्हा कोणताही रोगजंतू प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीर त्याला विवध प्रकारे मज्जाव करते. तरीही काही कारणांमुळे जंतू शरीरामध्ये पसरतात. जंतू जेव्हा रक्तामध्ये जातात तेव्हा त्यांना रक्तातील पांढऱ्या पेशी प्रतिरोध करतात. ही शास्त्रीयदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रक्रिया आहे. शरीरातील अशा काही पांढऱ्या पेशी प्रत्येक वेगळ्या जतूला अचूक ओळखू शकतात आणि त्याच विशिष्ट जंतूंना प्रतिकार करण्याची पद्धती अवलंबतात. शिवाय एकदा शरीरात घुसलेल्या विशिष्ट रोगाच्या जंतूची कायमस्वरूपी आठवण म्हणजेच मेमरी काही ठराविक कालावधीसाठी या पेशी ठेवत असतात. या कालावधीत त्याच रोगाचा जंतू जर दुसऱ्यांदा शरीरात घुसला तर या पेशी अतिशय तत्परतेने त्या आजाराच्या जंतूंचा लगेच खातमा करतात, त्या जंतूला अजिबात वाढ देत नाहीत. पांढऱ्या पेशींच्या रोगजंतूंची ओळख ठेवून आठवण ठेवण्याच्या खास वैशिष्ट्याचा फायदा लसीकरणामध्ये उचलला गेला आहे. म्हणजेच रोग निर्माण करणाऱ्या जंतूंना निष्क्रिय किंवा मृत करून शरीरात टोचायचं जेणेकरून पांढऱ्या पेशी त्या रोगासाठी आधीच तत्पर राहतील. म्हणून एका ठराविक कालावधीनंतर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे; अन्यथा पांढऱ्या पेशीना त्या जंतूंचा विसर पडतो आणि रोगजंतू शरीरात वाढून आजार निर्माण करतात. बरेचसे रोग आयुष्यात एकदा झाले, की परत होत नाहीत, याचे कारण या पेशींनी ठेवलेली त्या रोगाची आठवण/स्मृती होय. उदा. मानवातील देवी रोग. या रोगाची स्मृती आयुष्यभर पांढऱ्या पेशी ठेवीत असतात. लसीकरणामध्ये बुस्टर डोस हा शब्ददेखील आपण नेहमीच ऐकतो. बुस्टर म्हणजे काय की एकदा आपण लस दिली तर त्या लसीचा परिणाम व्हायला साधारण पंधरा ते एकवीस दिवस लागतात. ही पहिली मात्रा तेवढी परिणामकारक नसते; पण हीच लस जर दुसऱ्यांदा पंधरा दिवसांत परत दिली तर मात्र पांढऱ्या पेशी परत दुसऱ्यांदा जागृत होतात आणि दुप्पट क्षमतेने त्यांची रोगप्रतिकारशक्ती आणि स्मृती कार्यान्वित होते. रोग झाल्यावर त्या अधिक जलदगतीने कामाला लागतात. म्हणून प्रथम लसीकरण केल्यानंतर त्याच रोगाच्या लसीची पंधरा दिवसांत दुसरी मात्रा देणे म्हणजेच बुस्टर देणे आवश्यक आसते. या रोगाच्या लसीची स्मृती ठराविक कलवधीसाठीच, सर्वसाधारणपणे सहा ते बारा महिन्यांसाठी राहात असल्याने त्या त्या कालावधीत पुनश्च लसीकरण करून घेऊन पांढऱ्या पेशींना कायम त्या रोगासाठी तत्पर ठेवावे लागते. म्हणून लसीकरण सहा ते बारा महिन्यांत पुन्हा करून घेणे आवश्यक असते. लसीकरण करताना त्या त्या जंतूंचा विचार करूनच लसीची किमान मात्रा आणि ती देण्याची पद्धत ठरवलेली असते. उदा. माणसांत पोलिओ किंवा कोंबडीत मानमोडी रोगाची लस तोंडावाटे देता येते तर काही लसी डोळ्यांतून, नाकातून देता येतात. बऱ्याचशा लसी मात्र जनावरांच्या त्वचेखाली म्हणजेच सब-क्युटेनियस आणि त्वचेमध्ये म्हणजेच इंट्राडर्मल या पद्धतीने दिल्या जातात. काही लसी स्नायूंमध्ये म्हणजेच इंट्राडर्मल दिल्या जातात. काही लसी एक मिली, तर काही पाच मिली देतात. कोणत्याही पद्धतीने दिलेल्या लसीतील जंतूजन्य पदार्थ पांढऱ्या पेशीपर्यंत पुरेशा प्रमाणात पोचून पेशीमध्ये त्या रोगाची स्मृती निर्माण होणे महत्त्चे असते. म्हणून लस योग्य प्रमाणात/ मात्रेमध्ये आणि योग्य पद्धत वापरून दिली जाणे गरजेचे असते. म्हणूनच लसीकरण तज्ज्ञ पशुवैद्यकामार्फत करावे. लसीची परिणामकारकता वाढविण्यासाठी त्यामध्ये काही पदार्थदेखील मिसळलेले असतात ज्याला अड्जुवंट म्हणतात. अड्जुवंटमुळे लस जास्त कालावधीसाठी शरीरात राहून पांढऱ्या पेशींपर्यंत पोचते. त्यामुळे त्वचेतून आणि त्वचेखालून दिलेल्या लसीकरणात इंजेक्शनच्या ठिकाणी सूज किंवा गोळा निर्माण होतो. मात्र हे लक्षण योग्य लसीकरणाचाच एक भाग असून काही कालावधीनंतर ही सूज आपोआपच कमी होऊन जाते. लसीकरण केल्यावर काही वेळा ताप येतो. हेही लक्षण योग्य लसीकरणाचाच एक भाग असून ताप आल्यामुळे पांढऱ्या पेशी मोठ्या प्रमाणात कार्यान्वित होतात आणि योग्य लसीकरण झाल्याचे आढळते. लसीकरण केल्यावर कधीकधी जनावरांचे दुग्धोत्पादन एखाद्या दिवसा पुरते थोडेसे कमी होते परंतु लगेच ते पूर्ववत होत असते. याचे कारण लसीकरणामुळे शरीरावर एक दोन दिवसांसाठी किंचित ताण पडत असतो, त्याचा तात्पुरता परिणाम उत्पादनावर होऊ शकतो मात्र तो नगण्य असतो. लसीकरणासाठी जनावराचे योग्य वय
काही गंभीर आजारांत जनावरांमध्ये फक्त लहान वयातच लसीकरण करता येते, कारण प्रौढ जनावरांत लसीकरण केल्यास काही अपाय होण्याची शक्यता असते. उदा. जनावरांतील बृसेल्ला म्हणजेच संसर्गजन्य गर्भपात यात लहान वयातच लसीकरण करतात. आजारी जनावरांमध्ये लसीकरण करणे योग्य नसते कारण त्यामुळे अतिरिक्त ताण पडून आजार बळावतो आणि रोग बळावू शकतो. लसीकरण साधारण दिवसाच्या सकाळच्या प्रहरी किंवा संध्याकाळच्या वेळी करणे चांगले असते; जेणेकरून वातावरण थंड असते आणि लसीचा जास्त चांगला परिणाम होतो. उष्ण वातावरणात जनावरावर ताण पडतो म्हणून जनावर सावलीत असणे आवश्यक असते. कोणत्याही कारणाने जनावर तणावग्रस्त असेल तर पांढऱ्या पेशी योग्य प्रतिसाद देत नाहीत आणि लसीकरणाचा परिणाम होत नाही. म्हणून जनावर सुदृढ असणे आवश्यक असते. त्याची प्रकृती उत्तम असावी, त्याला कोणत्याही शारीरीक अन्न घटकाची कमतरता म्हणजे डेफीशियन्सी नसावी. जनावराच्या शरीरामध्ये कृमी किंवा जंत नसावेत; अन्यथा त्याची शारीरिक क्षमता कमी होते. त्यामुळे लसीकरण करण्यापूर्वी जनावराला किमान पंधरा दिवस आधी जंतनाशकाची मात्रा देणे गरजेचे असते. जनावर जर गर्भारपनागाभणकाळाच्या अंतिम कालावधी मध्ये असेल तर शक्यतो बऱ्याचशा जैविक लसी देणे योग्य नसते कारण त्यामुळे कदाचित गर्भपात होऊ शकतो. त्यामुळे अशा जनावरांत लसीकरण टाळतात. मात्र या काळात धनुर्वाताची लस देणे योग्य असते. लसीकरण नेहमी तज्ज्ञ पशुवैद्यकाकडूनच करून घेणे चांगले असते. लसीकरणाचा एक निश्चित असा कालावधीचा तक्ता असतो. त्या त्या महिन्यांमध्ये लसीकरण करणे चांगले आसते. याचे कारण असे आहे की संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वर्षातील ठराविक काळातच दिसून येतो. उदा. काही आजार पावसाळ्यात होतात जसे शेळ्या मेंढ्यातील आन्त्रविशार, तर काही आजार उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात होतात. काही आजार पक्षी- जनावरे लहान असताना होतात; तर काही आजार प्रौढ वयातच होतात. त्यामुळे अशा आजारांसाठी त्या जनावरे-पक्ष्यांना ठराविक वयातच लसीकरण करतात; तसेच ठराविक ऋतूपूर्वी लसीकरण करतात. त्यासाठी अनुभवाने प्रत्येक पक्षी - जनावरांसाठी लसीकरणाचा तक्ता तयार केलेला असतो, त्या तक्त्याप्रमानेच लसीकरण करावे. विषाणूजण्य रोगांमध्ये तर रोग झाल्यानंतर कोणताही उपाय उपलब्ध नसतो. कोंबड्यांमधील बहुतेक आजार असे असतात उदा. मानमोडी, बर्डफ्लू इत्यादी; तसेच रेबीज, लाळ्या खुरकूत, पिपिआर इत्यादी रोग. त्यामुळे अशा रोगांच्या जंतूंचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच जर व्यवस्थित लसीकरण केले तर हे आजार होतच नाहीत. लसीकरणाची परिणामकारकता वाढविण्यासाठी
कधी कधी लसीकरण परिणामकारक होत नाही ज्याला व्हॅक्सिनेशन फेल्युर म्हणतात. तणावाखालील जनावरांमध्ये, आजारात, शारीरक क्षय झालेल्या अवस्थेत, कमतरतेमध्ये असे होऊ शकते. लसीची योग्य मात्रा, त्याची निर्माण कालावधी म्हणजेच एक्सपायरी कालावधी आणि त्या लसींची योग्य साठवण आणि वाहतूक देखभालदेखील तितकीच महत्त्वाची असते. लसी जैविक पदार्थांपासून तयार केल्या असल्याने त्या सतत थंड जागी आणि किमान तापमानात ठेवायच्या असतात. ही थंड तापमानाची साखळी जर सांभाळली नाही तर जैवजण्य पदार्थांचा नाश होतो आणि लसीकरण फेल होते. त्यामुळे लस निर्माण झालेल्या क्षणापासून, स्टोकीस्टपासून जनावराला देण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी बर्फात राहील किंवा निर्देशित तापमानात राहील याची काळजी घेणे अावश्यक असते, ज्याला कोल्ड चेन मेंटेन करणे म्हणतात. संपर्क ः ः डॉ. प्रशांत म्हसे ः ९०११४११०६६ सूक्ष्म जीवशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा