उष्णता वाढल्याने जनावरांत जास्त ऊर्जा वापरली जाते. श्वसनदर वाढतो, भूक कमी होते, तहान वाढते, रवंथ कमी होतो, लाळ सुरू होते, तोंडाने श्वास सुरू होतो, कोठीपोटाचा सामू वाढतो, कोठीपोटात आम्लता वाढते, उन्हाळ्यात जनावरे माजचक्र बंद करतात, मुका माज दाखवितात. भाकड काळ वाढतो. दोन वेतांतील अंतर वाढते.उष्णतेचा ताण असणारी जनावरे उभीच राहतात, नाकावाटे होणारा रक्तस्राव उष्णतेचा तीव्र परिणाम दर्शवतो.
गोठा व्यवस्थापन
जनावरे सावलीत ठेवावीत. गोठा, सावलीतील छत जास्तीत जास्त उंच असावे. दोन जनावरांमध्ये योग्य ते अंतर ठेवावे.जनावरे रात्रीच्या वेळी मुक्त संचार पद्धतीने सांभाळावीत. जनावरांना मुक्तपणे गरजेनुसार थंड, स्वच्छ आणि निर्जंतुक पाणी पाजावे. उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी हवेच्या दिशेस थंड पाण्याने भिजवलेले पडदे बांधावेत. दुपारच्या वेळी छत थंड करावे, म्हणजे गोठ्यातील तापमान चार ते पाच अंशांनी कमी होईल.गोठ्याच्या छतास सूर्यकिरण परावर्तित होण्यासाठी वरच्या बाजूस पांढरा रंग द्यावा. गोठ्याचे लोखंडी पत्रे, सिमेंट पत्रे, जाड पडदे, उष्णतारोधक गवत पेंढा, मोठ्या पानांच्या सावल्यांनी झाकावेत. जनावराच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी त्याच्या अंगावर ओला कपडा, पोते टाकावे. अंग ओल्या कपड्याने पुसून घ्यावे. बांधलेल्या जनावरांना उष्णतेचा ताण अधिक असतो, म्हणून मुक्त संचार व्यवस्थापनाचा अवलंब करावा. थंडावा, निर्माण करण्यासाठी तुषार फवारे पद्धत अधिक उपयुक्त ठरते. उन्हाळ्यात शरीरासाठी पाण्याची गरज ३० टक्के अधिक वाढते. पाण्याची साठवणूक मातीची रांजणे, सिमेंट पाइपद्वारे करावी. जड, गढूळ, वास येणाऱ्या दूषित पाण्यातून बाधा होण्याची शक्यता असते. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे सांसर्गिक रोग पसरू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण करावे. जनावरांना सगळा आहार दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी पहाटे सहापर्यंत पुरवावा. पशुखाद्यात प्रति जनावरास शरीर वजनानुसार २० ते ५० ग्रॅम खाण्याचा सोडा द्यावा. घामावाटे सोडिअम, क्लोराइड क्षार कमी होत असल्याने, प्रति जनावर दररोज शरीर वजनानुसार २५ ते ५० ग्रॅम आयोडिनयुक्त मीठ द्यावे.ताक, गूळ, मीठ, क्षार मिश्रणे दररोज द्यावीत. जनावरांना ऊस, उसाचे वाढे, वाळलेला ऊस, उसाची पाने एकूण चाऱ्याच्या ३० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात देऊ नयेत. ऊस कुट्टी, ऊस पाने यावर एक टक्का चुन्याची निवळी शिंपडावी. युरिया प्रक्रिया केलेला चारा सहा महिन्यांखालील वासरांना देऊ नये. तर मोठ्या जनावरांच्या खाद्यामध्ये युरियाचे प्रमाण तीन ते चार टक्क्यांपेक्षा वाढणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळ्यात पुरविल्या जाणाऱ्या सर्व वाळलेल्या चाऱ्यावर युरिया, मळीप्रक्रिया नेहमी फायद्याची ठरते. हायड्रोपोनिक्स चाऱ्याचा वापर करावा. शरीरातील ऊर्जेच्या पूर्ततेसाठी दुय्यम (काळा) गूळ दररोज वापरावा. सर्व प्रकारचे डोंगरी गवत चारा म्हणून वापरता येते.टरबूज- खरबूज साली, काकड्यांचा वापर पशुआहारात करता येतो. केळी, आंबे, संत्री या फळांच्या साली पशुआहारात वापराव्यात. गिरिपुष्प, ॲझोला, उंबर, पिंपळ, अंजन, बोर, कडुनिंब, आंबा, वड, बेल, जांभूळ, शमी, सुबाभूळ, शेवरी यांचा वापर करावा. थकलेली, अशक्त, पाण्याचा अंश कमी झालेली जनावरे पशुवैद्यकांना दाखवावीत. अंगातील उष्णता कमी होण्यास मदत करणारी केसगळ दिसून न आल्यास म्हशी योग्यप्रकारे संपूर्ण भादरून घ्याव्यात. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना
उन्हाळ्यात शरीर ताण कमी करणाऱ्या वनस्पतिजन्य औषधी अश्वगंधा, शतावरी यांसह इतर औषधी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्याव्यात. उन्हाळ्यात किमान १५ दिवसांनी जनावरांची वैद्यकीय तपासणी करून प्रतिबंधात्मक उपचार करावेत. रवंथ क्रिया आणि कोठीपोटाचे कार्य सुरक्षित राहण्यासाठी जैवसंवर्धक विशेष औषधी उपाय (यीस्ट कल्चर, प्रोबायोटिक्स, कोठीपोट उत्तेजक औषधी) पशुवैद्यकाच्या सल्ल्याने करावेत. - डॉ. सी. व्ही. धांडोरे, ९३७३५४८४९४
(पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर)