लिस्टरियोसिस आजारामध्ये जनावरे मान एकीकडे खेचून वर्तुळाकार पद्धतीत फिरत असतात. त्यामुळे यास गोलाकार फिरण्याचा आजार (सर्कलिंग डिसीज) असेही म्हणतात. यामध्ये एकतर्फी (कान, पापण्या, ओठ व डोळ्यांसह चेहऱ्याचा) पक्षाघात होऊ शकतो. शेवटी जनावर एका बाजूला पडून , श्वसन क्रिया निकामी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडू शकते. लि स्टरियोसिस हा मनुष्य आणि प्राण्यांचा तीव्र संसर्गजन्य आजार आहे. हा आजार ‘लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स’ या जिवाणूमुळे होतो. हा मानवापासून जनावरांना आणि जनावरांपासून मानवाला होणारा आजार आहे. या आजाराला मेंढ्या, जनावरे, शेळी, डुकर, ससा, पक्षी आणि मनुष्य सुद्धा प्रभावित होऊ शकतात. या आजारामुळे गाभण जनावरांमध्ये गर्भपात (तिसऱ्या तिमाहीमध्ये) होऊ शकतो. आजारामुळे कळपाचे रोगग्रस्त होण्याचे प्रमाण साधारणत: १० टक्के एवढे असते. तर मृत्यू दर जवळजवळ १०० टक्के आहे. संसर्ग
मेंदूचा ज्वर / दाह (मेनिंगो-एन्सेफलायटीस). गर्भवती गर्भाशयाचा संसर्ग आणि परिणामी गर्भपात. रक्तदोष (सेप्टिसेमिक) किंवा अनेक अवयवांचा दाह / रोग (व्हिसरल फॉर्म) जेव्हा आजाराचा उद्रेक होतो तेव्हा सर्व प्राण्यांना यापैकी केवळ एक प्रकार (फॉर्म) दिसून येतो. याचा संसर्ग नाकाची श्लेष्मल त्वचा किंवा नेत्रश्लेष्मातून होतो. तेव्हा तीव्र स्वरूपाचा आजार होण्याची शक्यता असते. तोंडातून ट्रायजेमिनल या मज्जातंतूद्वारे जंतूचे संक्रमण होते. दूषित चाऱ्यापासून बनविलेल्या मुरघासामध्ये याचे जिवाणू असतात. त्यापासून संसर्ग होऊ शकतो. जिवाणू दुधातून देखील प्रसारित होतात . आजारी जनावरांची विष्ठा, मूत्र, दूध, गर्भाशयातील द्रव स्राव आणि गर्भपात स्रावाद्वारे जिवाणू बाहेर पडतात. स्त्रावामुळे दूषित झालेला चारा जनावरांनी खाल्यावर जिवाणू आतड्याच्या श्लेष्मल त्वचेद्वारे प्रवेश करतो. आणि तेथून रक्तामध्ये प्रवेश करतो. त्यामुळे बॅक्टेरिमियाची स्थिती तयार होते. त्यानंतर एखाद्या प्राण्यामध्ये प्राणघातक सेप्टीसीमिया होऊन जिवाणू वेगवेगळ्या अवयवांमध्ये स्थानिकीकरण करतो. गर्भवती मादी जनावरांच्या गर्भाशय संसर्गास हे जिवाणू अतिसंवेदनशील असतात. त्यामुळे बाळ दानीचा दाह (मेट्रायटीस) उद्भवतो. परिणामी गर्भपात ( शेवटच्या तिमाहीमध्ये) होतो. नाकाद्वारे संसर्गामुळे मध्यवर्ती मज्जा संस्थेचा दाह (मेनिन्गॉन्सेफलायटीस) होतो. या प्रकारामध्ये जिवाणू फक्त मेंदूत असतात. इतर कुठेही नसतात . ते मध्यवर्ती मज्जा संस्थेवरील मेंदुज्वरात परिणाम करतात. हे जिवाणू शक्तिशाली रक्तविघटक (हेमोलायसिन्स) तयार करतात. त्यामुळे लाल पेशी नष्ट होतात. परिणामी त्यामुळे रक्तक्षय होतो. लक्षणे लक्षणे ही जिवाणूच्या स्वरूप व प्रकारावरून ठरतात. चिंताग्रस्त स्वरूपाचा प्रकार (मेंदु व चेतासंस्थेचा आजार)
हा प्रकार सर्व प्राण्यांमध्ये आढळतो. परंतु मेंढीमध्ये तो अधिक तीव्र स्वरूपाचा असतो. या प्रकारामध्ये जनावरांचा मृत्यू ३-४ दिवसांत होतो. तर जनावरांमध्ये मृत्यू १- २ आठवड्यात होतो. तापमानात वाढ झाल्यामुळे जनावरे सुस्त दिसतात. मान एकीकडे खेचून जनावरे वर्तुळाकार पद्धतीत फिरत असतात. त्यामुळे यास गोलाकार फिरण्याचा आजार (सर्कलिंग डिसीज) असे म्हणतात. श्वसनाची समस्या वारंवार दिसू शकते. एकतर्फी (कान, पापण्या, ओठ व डोळ्यांसह चेहऱ्याचा) पक्षाघात होऊ शकतो. शेवटी जनावर एका बाजूला पडून , श्वसन क्रिया निकामी झाल्यामुळे मृत्यूमुखी पडू शकते. अवयव विकृती करणारा प्रकार
रक्तामधून संसर्ग झाल्यास, फार कमी वेळा गर्भपात होऊ शकतो. नाळेची धारणा वारंवार होते. निराकरण न झालेल्या गर्भपातांचे कारण लिस्टेरिरिओसिस असू शकतो. प्रौढ जनावरांमध्ये हे होत नाही. फक्त तरूण घोडे, कोकरे, वासरे आणि पिल्ले यांच्यात परिणाम करतो. मात्र , यामध्ये मेंदूवर परिणाम होत नाही. यामुळे जनावरांमध्ये सुस्तपणा, निस्तेजपणा येतो. रक्तामध्ये पू एकत्रित होतो. अतिदाहामुळे जनांवरामध्ये चिंताग्रस्त लक्षणे दिसतात. आतड्यावरील सूज आणि यकृत निकामी झाल्याचे दिसते. मेंदूचा दाह, मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. त्यामुळे कार्यात अडथळा निर्माण होतो. काही वेळा मेंदूमध्ये लहान फोड दिसून येतात. आणि उती मरतुक आढळते. इतर अवयवांचा दाह, उतींची मरतुक (नेक्रोसीस) आढळते. निदान बाह्य लक्षणावरून निदान
बाधित जनावरे सतत गोलगोल फिरतात (सर्कलिंग). मेंदू, यकृत या अवयवांचे उती निरीक्षण / हिस्टोपाथोलॉजी करून रोगनिदान करता येते. रक्त, रक्तजल, उती यांमधून जिवाणू निरीक्षण करून निदान होते. रक्तजल परीक्षेमधून जिवाणू विरुद्ध तयार झालेल्या प्रतिपिंडांचे निदान होते. या आजारावर उपचार करणे थोडे अवघड असते. कारण, संसर्गाच्या पातळीनुसार उपचाराचा कालावधी बदलू शकतो. लिस्टेरिओसिसच्या उपचारांसाठी जनावरे आणि मानवांमध्ये, प्रतिजैविकांचा उपयोग दीर्घ काळापासून केला जात आहे. सल्फोनोमाइड्स, पेनिसिलिन आणि टेट्रासाइक्लिन प्रतिबंधक (प्रोफेलेक्टिक्स) म्हणून या आजारामध्ये वापरले जाऊ शकतात. दूषित पदार्थ, कचरा आणि संक्रमित मृतदेहांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे असते. जनावरांना कुजलेल्या भाज्या खाऊ घालू नयेत. तसेच कुजलेला, दुर्गंधीयुक्त मूरघास देखील खाऊ घालू नये. रोगाच्या प्रादुर्भाव असलेल्या भागातील मूरघास जनावरांना खाऊ घालू नये. पशुपालकांनी योग्य स्वच्छता राखावी. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली जनावरे या रोगाच्या प्रादुर्भावासाठी अधिक संवेदनशील असतात. त्यामुळे या आजारामध्ये योग्य ती खबरदारी वेळेवर घेणे आवश्यक आहे. - डॉ. सं. डी. मोरेगांवकर, ९२८४६८०७६२ (पशुविकृतीशास्त्र विभाग, पशू वैद्यकीय महाविद्यालय, परभणी )