डॉ. विजयसिंह लोणकर, डॉ. शुभम नागरगोजे Poultry Farming Management: वातावरणातील तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यानंतर खाद्य सेवन घटून कोंबड्यांमध्ये उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. ३१ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरणे आणि त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे..उन्हाळ्याच्या दिवसात कोंबड्यांमध्ये उष्माघाताचा त्रास दिसतो. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शारीरिक क्रियांवर परिणाम होतो आणि त्यांच्या वाढ, उत्पादन तसेच आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येतो. घामग्रंथी नसल्यामुळे त्यांना घाम येत नाही. याचा विपरीत परिणाम म्हणून कोंबडी उन्हाळ्यात स्वतःच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकत नाहीत. ब्रॉयलर, लेअर कोंबड्यांच्या योग्य वाढीसाठी व उत्पादनासाठी वातावरणातील तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस असणे अपेक्षित आहे. परंतु उन्हाळ्यामध्ये तापमानात यापेक्षा दुपटीने वाढ होते आणि एकदा का तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले, की शारीरिक तापमान कमी करण्याकरिता तोंडावाटे श्वासोच्छ्वास घ्यावा लागतो. .Heatstroke Treatment: अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू.उन्हाळ्यामध्ये कोंबड्या धापा टाकत असताना शरीरातील उष्णता तोंडावाटे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतात आणि जर वातावरणातील सापेक्ष आर्द्रता अधिक असेल तर तोंडावाटे निघणारी उष्णता वातावरणातील हवेत मिसळण्यास अडचण निर्माण होते. धापा टाकण्याची वारंवारता वाढल्यास शरीरातील पाण्याचे नुकसान होऊन निर्जलीकरण होण्याची शक्यता वाढते. वातावरणातील तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस असल्यास ते कोंबड्यांच्या वाढीसाठी व उत्पादनासाठी सोईस्कर असते. २२ ते २५ अंश सेल्सिअस तापमान कोंबड्यांना त्रासदायक नसते परंतु त्यांचे खाद्य सेवन घटते. .वातावरणातील तापमान २६ ते ३० अंश सेल्सिअस गेल्यास खाद्य सेवन घटून उष्णतेचा त्रास होण्यास सुरू होतो. ३१ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानाच्या दरम्यान उष्माघाताचा त्रास वाढतो. या तापमानादरम्यान व्यवस्थापनात अपेक्षित बदल करणे गरजेचे असते. व्यवस्थापनात योग्य ते बदल न केल्यास आणि वातावरणातील तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यास उष्माघात तीव्र होतो. त्यामुळे कोंबड्या मृत्युमुखीही पडतात आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते..उष्माघाताची लक्षणेउष्णतेच्या तणावामुळे धापा टाकण्याचे प्रमाण वाढते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.अंतर्गत अवयवामधून रक्त त्वचेकडे सरकते, ज्यामुळे स्नायूचा रंग अस्पष्ट होतो.मंदपणा व सुस्ती येते आणि एका ठिकाणी पडून राहतात.पाणी पिण्याचे प्रमाण तीन ते चार पट वाढते व खाद्यसेवनाचे प्रमाण वेगाने घटते. पिण्याच्या पाण्याचे तापमान जास्त असल्यास कोंबड्या पाणी कमी पितात त्यामुळे उष्माघाताचा त्रास अधिक जाणवतो..काही कोंबड्यांचे पाय लटपटतात व चक्कर येऊन खाली कोसळतात.कोंबड्यांना मृत्यूपूर्वी झटके येतात आणि मृत्युदरात वाढ होते. शरीरातील अति उष्णता बाहेर टाकण्यासाठी कोंबड्या पंख पसरवतात किंवा पाय लांब करून शरीराचा जास्तीत जास्त भाग गादीच्या किंवा हवेच्या संपर्कात आणण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर टाकली जाईल.कोंबड्यांच्या विष्ठेमध्ये पाण्याचे प्रमाण वाढल्याने गादी ओली होते आणि गादीमध्ये घातक अमोनियाचे प्रमाण वाढते. अति उष्ण तापमानामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन रोगास बळी पडण्याची शक्यता असते.कोंबड्यांचे खाद्याचे मांस, अंड्यात रूपांतर करण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे परिणामी उत्पादन कमी मिळते..Heatwave Impact: उष्माघाताच्या रुग्णांत वाढ.व्यवस्थापनाचे तंत्रशेडमध्ये उन्हाचा शिरकाव टाळण्यासाठी शेडची बांधणी पूर्व-पश्चिम केलेली असावी. शेडची मध्य उंची किमान १३ ते १५ फूट असावी आणि भिंतीलगतची उंची ८ फूट असावी.शेडला वापरला जाणारा पत्रा सिमेंटचा असावा आणि त्यावरती उष्णता रोधक आवरण वापरावे. शेडला किमान तीन फूट लांबीचा पत्रा शेडपासून बाहेर काढलेला असावा जेणेकरून दुपारचे ऊन शेडमध्ये शिरकाव करणार नाही.शेडवर स्प्रिंकलर बसवावेत. शेडच्या पत्र्यावर प्रत्येक दहा फुटांवरती एक स्प्रिंकलर बसवावा. स्प्रिंकलरचे पाणी पत्र्यावरती पडल्यामुळे पत्रे ओले होतात, त्यामुळे शेडमधील तापमान कमी करण्यास मदत होते..शेडच्या आतून फॉगर्सचा वापर करता येतो. शेडमधील तापमान कमी करण्यासाठी बाष्पीभवन एक सर्वांत उत्तम व परिणामकारक उपाय आहे. फॉगर्समुळे पाणी धुक्यासारखे फवारले जाते ते जमिनीपर्यंत पोहोचतानाच बाष्पीभवन होते. सदर बाष्पीभवनामुळे कोंबड्यांची आसपासची हवा थंड राहते, शेडमधील वातावरण आल्हाददायी मिळते.अति उष्ण तापमानाच्या भागांमध्ये पूर्णपणे बंदिस्त पद्धतीचे आणि खुल्या पद्धतीचे वातानुकूलित शेड बांधणी करता येते. पूर्ण बंदिस्त शेडमध्ये एका बाजूने इव्हॅपोरेटेड कूलिंग पद्धतीने (बाष्पीभवनशील शीतकरण प्रणाली) थंड हवा शेडमध्ये सोडली जाते आणि दुसऱ्या बाजूने एक्झॉस्ट फॅनच्या साह्याने खेचून बाहेर फेकली जाते. यामुळे शेडमधील तापमान, आर्द्रता आणि वायुविजन संतुलन केले जाते. अशा शेडमधील वातावरण संगणकाच्या साह्याने पूर्णपणे नियंत्रित ठेवता येते. अत्यंत उष्ण हवामानात फक्त पंख्यांचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्यामुळे बाहेरील गरम हवा हात खेचली जाऊ शकते. योग्य शीतकरण आणि व्यवस्थापनामुळे उष्णतेचा ताण प्रभावीपणे कमी करता येतो. वातानुकूलित शेडचे तापमान १८ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान ठेवता येते. त्यामुळे कोंबड्यांची वाढ चांगली होते, मरतुकीचे प्रमाण कमी होते..उष्णतेची तीव्रता कमी करण्यासाठी शेडमध्ये हवा खेळती राहील याची व्यवस्था करावी. प्रक्षेत्राच्या आजूबाजूला उंच जाणारी झाडे व हिरवळ ठेवावी. ज्यामुळे नैसर्गिक सावली मिळते.उन्हाळ्यामध्ये कोंबड्यांना अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्यावी. शेडमधील गर्दी टाळावी.उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी ताणविरहित औषधी पाण्यातून वापरावे, त्याचबरोबर पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.पिण्याचे पाणी थंड ठेवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. सतत स्वच्छ ताजे आणि थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. पिण्याच्या पाण्याची टाकी थंड राहण्यासाठी शेडच्या आतील बाजूस पाण्याची टाकी ठेवावी. टाकीला पांढरा रंग द्यावा जेणेकरून उष्णता कमी होईल..उन्हाळ्यात खाद्य सेवन लक्षणीयरीत्या कमी होते ज्यामुळे शरीराचे वजन मांस उत्पादन अंडी उत्पादन आणि अंडी कवच गुणवत्ता कमी होते. त्यासाठी योग्य ते खाद्य व्यवस्थापनात बदल करणे आवश्यक आहे. नेहमी थंड वातावरणामध्ये म्हणजेच सकाळी लवकर आणि सायंकाळी खाद्य द्यावे. भर उन्हामध्ये खाद्य देऊ नये. उन्हाळ्यामध्ये पाण्याची भांडी व खाद्याची भांडी यांच्या संख्येत वाढ करावी.खाद्यातील ऊर्जेचे प्रमाण कमी करून खाद्यामध्ये खनिज जीवनसत्त्वे आणि अमिनो आम्ल योग्य प्रमाणात असल्याची खात्री करून घ्यावी. खाद्यात एकूण प्रथिनांचे प्रमाण जास्त वाढवू नये, कारण अतिरिक्त प्रथिनांचे पचन करताना किडणीवर ताण येतो. खाद्यात प्रथिनांऐवजी थेट लायसिन आणि मिथियोनिनसारखी अमिनो ॲसिड्स वाढवावीत. यामुळे स्नायूंची वाढ आणि अंडी उत्पादन टिकून राहते..उन्हाळ्यात कोंबड्यांच्या शरीरात ‘क’ जीवनसत्त्व कमी तयार होते. पाण्यातून किंवा खाद्यातून ‘क’ जीवनसत्त्व दिल्यास उष्णतेचा ताण लक्षणीयरीत्या कमी होतो. त्याचबरोबर, पक्षांना ‘ई’ जीवनसत्त्व आणि सेलेनियम दिल्यास हे पेशींचे नुकसान टळते आणि कोंबड्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.उष्णतेमुळे कोंबड्या वेगाने श्वास घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो आणि रक्तातील सामू बिघडतो. सोडिअम बायकार्बोनेट (खाण्याचा सोडा) खाद्यात ०.२ ते ०.५ टक्का सोडा मिसळल्याने रक्तातील संतुलन टिकते आणि अंड्याचे कवच मजबूत राहते..अंड्याच्या कवचावर उष्ण वातावरणाचा परिणाम आणि उपायउन्हाळ्यामध्ये अंड्याच्या कवचाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारा घटक म्हणजे, उन्हाळ्यामध्ये कोंबड्या पुरेसा आहार, सेवन करत नाहीत. जेव्हा पर्यावरणीय तापमान अवाजवी वाढते, तेव्हा आहाराचे सेवन कमी होते. परिणामी, अमिनो आम्ल, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि इतर तत्त्वांचे अपुरे सेवन, सहसा आहारातील पोषक तत्त्वांची घनता समायोजित करून, दुरुस्त करता येते.अंड्यावरील कोंबड्यांमध्ये उष्णतेच्या तणावाचे, मुख्य परिणाम म्हणजे आहार सेवन कमी होणे, आतड्यातील रक्तप्रवाह कमी होणे, रक्तातील आयोनाइज्ड कॅल्शिअमची पातळी कमी होणे, कार्बन डायऑक्साइडचा दाब अंशतः कमी होणे, गोण्याडोट्रॉपिन संप्रेरकांच्या (हायपोथेल्यामिक संप्रेरके) कार्यामध्ये हस्तक्षेप होणे, हे आहेत. हायपोथेल्यामिक संप्रेरके, लुटीनाइझिंग संप्रेरकाचे नियमन करते, आणि हेच लुटीनाइझिंग संप्रेरक, अंडी निर्मितीसाठी महत्त्वाचे कार्य बजावते. उष्णतेच्या तणावात, अंडी कवचाची जाडी लक्षणीयरीत्या कमी होते..ॲसिडबेस असमतोलामुळे, कॅल्शिअम व फॉस्फरसची कमतरता कमी होते. जास्त तापमानाच्या वातावरणीय उष्णतेमुळे कोंबड्या धापा टाकतात. धाप लागल्यामुळे, कार्बन डायऑक्साइड वायूचे प्रमाण जास्त प्रमाणात कमी होते (श्वसन क्षारता), परिणामी, ॲसिडबेस असमतोल होते, रक्ताचा अल्कलोसिस होतो. या ॲसिडबेस असमतोलामुळे, शरीरातील कॅल्शिअम व फॉस्फरस वाया जातात, किंवा कमी पडतात.ज्या वेळेस वातावरणातील तापमान २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असते, त्या वेळेस अंड्याचे वजन प्रति १ अंश सेल्सिअससाठी, सुमारे ०.४ टक्का कमी होते. वातावरणीय तापमान, २७ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल, तर अंड्याच्या वजनामध्ये, प्रति १ अंश सेल्सिअस तापमान वाढीसाठी, ०.८ टक्के इतकी घट होते. सामान्यत:, वातावरणीय तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गेल्यावर अंडी उत्पादन दरावर परिणाम होतो..गर्भाशयामध्ये अंड्याचे कवच, रात्रीच्या कालावधीमध्ये निर्माण होते, परंतु अंड्याच्या कवचाची प्रत सुधारण्यासाठी खाद्यातून दिले जाणारे कॅल्शिअम उपलब्ध होत नाही. कारण रात्री खाद्य दिले जात नाही. म्हणून अंड्याच्या कवचाची प्रत सुधारणे, किंवा अंड्याचे कवच मजबूत करण्यासाठी, गर्भाशयामध्ये रात्रीच्या वेळी, कॅल्शिअमची उपलब्धता वाढविण्यासाठी, कोंबड्यांना सायंकाळी, चार ते पाच यादरम्यान, प्रति कोंबडी तीन ते चार ग्रॅम, याप्रमाणे खाद्यावर शिंपल्यांचा चुरा किंवा मार्बल चिप्स देणे गरजेचे असते.- डॉ. विजयसिंह लोणकर, ७८७५५७०३९२(कुक्कुटपालनशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.