नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून आदर्शवत जलक्रांती घडली. समन्यायी जल वितरण व व्यवस्थापनाचे देशातील आदर्श मॉडेल संस्थेने उभारले. त्यातून एकेकाळी २५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखालील परिसर १० हजार हेक्टरपर्यंत पोचला. फळे, भाजीपाला, फूलशेती यांच्याबरोबरच अन्य उद्योगांचा विकास झाला. निर्यात झाली. शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक पत वाढली. प्रकल्प कार्यक्षेत्रात या सर्वांतून मिळून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य तयार होण्याची क्षमता तयार झाली. परिवर्तनासाठी तीन प्रकारच्या पाण्याची आवश्यकता असते. एक शेतशिवार फुलवण्यासाठी, दुसरे कर्तबगारीसाठी अंगात पाणी आणि तिसरे समाजाचे दुःख पाहून आपल्या डोळ्यांत येणारे पाणी. नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध वाघाड प्रकल्पाच्या प्रेरणादायी कार्यातून या तीनही प्रकारच्या पाण्यातून परिवर्तन घडले आहे. चळवळीतून पाणीवापर संस्थेचा जन्म तो काळ होता १९८७ सालचा. वाघाड प्रकल्पावर एक कालवा ओझर मिगपर्यंत अस्तित्वात होता. पारंपरिक पद्धतीने आवर्तन घेणारे मोजके शेतकरी परिसरात होते. परिणामी, २५ हेक्टरपर्यंतच क्षेत्र ओलिताखाली होते. परिसरातील लोक रोजंदारीने खडी फोडण्याच्या किंवा अन्य कामांना जायचे. जलसिंचनातून भागात परिवर्तन घडू शकते, ही बाब दूरदृष्टी लाभलेल्या बापू उपाध्ये व कै. भरत कावळे यांनी ओळखली. त्यांनी जलसाक्षरतेचा वसा हाती घेत कामे सुरू केली. अनंत अडचणी आल्या. पण, चळवळ थांबली नाही. हळूहळू वाघाड प्रकल्पावरील शेवटपर्यंतच्या शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व समजू लागले. तेही चळवळीत सहभागी झाले. यातूनच पाणीवापर संस्थेचा जन्म झाला. पाणीवापर संस्थांची वाटचाल समाज परिवर्तन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात झालेले काम देशासाठी दिशादर्शक आहे. सुरुवातीला वाघाड प्रकल्पावर तीन पाणीवापर संस्था स्थापन झाल्या. सन २००३ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला. त्याच्या अवलोकनातून जलसुधार प्रकल्प व २००४ मध्ये एकूण २४ पाणीवापर संस्था अस्तित्वात आल्या. पुढे २००५ मध्ये संपूर्ण प्रकल्पाचे सिंचन व्यवस्थापन हस्तांतरित झाले. हेडपासून ते टेलपर्यंत सर्व शेतशिवार ओलिताखाली आले. जलक्रांती घडली पारंपरिक पिकांपासून शेतकरी व्यावसायिक पिकांकडे वळला. मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, भाजीपाला व फूलशेती होऊ लागली. पाणीवापराचे महत्त्व समजल्याने ३० टक्के बचत होऊ लागली. शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुली १०० टक्के होऊ लागली. एके काळी केवळ २५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली असलेला भाग तब्बल १० हजार हेक्टर लाभक्षेत्रावर गेला. सक्षम सिंचन व्यवस्था राज्य सरकारने पाणीवापर संस्थेच्या माध्यमातून पाणीवाटपाचे धोरण स्वीकारले. सन २००५ मध्ये या संबंधीचा कायदा करून फेब्रुवारी २००६ मध्ये अंमलबजावणी सुरू झाली. वाघाड प्रकल्पकार्याची २००४ व २००७ मध्ये राष्ट्रीय उत्पादकता पुरस्काराने दखल घेण्यात आली. जलव्यवस्थापनाचा आदर्श देशासमोर उभा राहिला. प्रत्येक शेतकऱ्याला शाश्वत सिंचनव्यवस्था निर्माण झाल्याने तो सक्षम झाला. पाणीवापर संघांच्या संस्थांद्वारे सिंचन व्यवस्थापन क्षेत्रातील हा पहिला प्रकल्प ठरला. संस्थांनीही बिनविरोध निवडणुका करून आदर्श निर्माण केला. महाराष्ट्र जलसुधार-प्रकल्पांतर्गत वाघाड उजवा व डावा दोन्ही कॅनाल पुनर्स्थापनांतर्गत कामे झाली. दृष्टिक्षेपात वाघाड प्रकल्प :
‘वाघाड’ संस्थेच्या कामकाजाची वैशिष्ट्ये :
शेतकऱ्यांचा सहभाग संस्थेमध्ये शेतकऱ्यांना, त्यातही महिलांना विशेष स्थान आहे. हक्काच्या पाण्याचे व्यवस्थापन, वितरण, सिंचन विषयक पायाभूत सुविधांचे परीक्षण करण्याची जबाबदारी विविध क्षेत्रांनुसार संस्थांकडे दिली आहे. पाण्याचा काटेकोरपणे वापर करण्यासाठी सूक्ष्मसिंचनावर भर दिला आहे. प्रकल्प कार्यक्षेत्रातील शेतीचा कायापालट ओलिताखालचे क्षेत्र वाढल्यानंतर भाजीपाला, फळपिकांच्या क्षेत्रवाढीसह उत्पादन वाढीसही चालना मिळाली. सन २००९ साली संस्थेने वाघाड फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली. कृषी विभाग ‘आत्मा’ यांच्या वतीने ओझर येथे शेतमाल प्रक्रिया केंद्र, तर मोहाडी येथे प्रक्रिया उद्योग केंद्राची स्थापना झाली. शेतकऱ्यांसाठी पाणी, पीक व्यवस्थापनाबाबत चर्चासत्रे, प्रात्यक्षिके घेतली जातात. औरंगाबाद येथील वाल्मी संस्थेतही शिखर संस्थेचे प्रतिनिधी प्रशिक्षण घेतात. लाभक्षेत्राखालील पिके व प्रकल्प फळबाग- द्राक्षे, पेरू, डाळिंब, चिकू, लिंबू, आंबा फूलशेती- झेंडू, गुलाब, जरबेरा भाजीपाला- टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर, कारले, गिलके, भोपळा, काकडी, तोंडली, दोडका पालेभाज्या- मेथी, कोथिंबीर, शेपू, पालक, कांदापात, पुदिना, शतावरी एकरी उत्पादन (प्रतिएकरी)
असे घडले बदल
मान्यवरांच्या भेटी जागतिक बँकेचे ब्राझील येथील प्रतिनिधी जॉन ब्रिस्को, तसेच अन्य अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाणीवापर संस्थांशी संवाद साधला आहे. आदर्श समन्वय
वाघाड पाणीवापर संस्था म्हणजे सिंचन प्रणालीतील आदर्श प्रकल्प आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या जीवनात सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थैर्यता आली. एकविचार, एकपक्ष यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. - शहाजीराव सोमवंशी संस्थापक, माजी अध्यक्ष, वाघाड पाणीवापर संस्था समाज परिवर्तन केंद्राचे अध्यक्ष कै. बापू उपाध्ये व कै. भरत कावळे यांच्या प्रेरणेतून व सक्रिय प्रयत्नांतून पाणीवापर संस्था निर्माण झाल्या. शासनाने संस्थांना हक्क देऊन प्रत्येक हंगामात पाणी देण्याची खात्री दिल्याने परिसरात खडकाळ जमिनीचे रूपांतर नंदनवनात झाले. संपर्क- र्क्ष्मीकांत वाघावकर सरचिटणीस-समाज परिवर्तन केंद्र सदस्य, ‘वाघाड’ संस्था संपर्क- ८२०८४४७२९०७
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.