किसान कनेक्ट शेतकरी कंपनीचे संकलन व प्रतवारी केंद्र व कंपनीची इमारत
किसान कनेक्ट शेतकरी कंपनीचे संकलन व प्रतवारी केंद्र व कंपनीची इमारत  
यशोगाथा

'किसान-कनेक्ट’कडून फळे-भाजीपाल्याची २२० टनांपर्यंत विक्री; ९५ लाखांपर्यंत उलाढाल

प्रतिनिधी

राहुरी : श्रीरामपूर (जि. नगर) येथील राष्ट्रीय पातळीवर अग्रेसर प्रभात डेअरीने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकत्रित करून ‘किसान-कनेक्ट फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ ची स्थापना केली आहे. सध्याच्या कोरोना लॉकडाऊनच्या संकटात कंपनीच्या दीडशेहून अधिक सभासदांकडील विविध ताजा भाजीपाला व फळांना मुंबई व पुणे शहरांतील निवासी सोसायट्यांची हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. आत्तापर्यंत एकूण सुमारे २२० टन मालाची विक्री होऊन ९५ लाख रुपयांपुढे उलाढाल करण्यात या शेतकरी कंपनीला यश मिळाले आहे. ‘प्रभात’ ने दुग्धव्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला. विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे व विस्ताराचे कार्यक्रम राबवले. त्यातून जिल्ह्यातील दुग्धव्यवसायाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. याप्रमाणेच शेती उद्योगातही संस्थेने वाटचाल सुरू केली आहे. आपल्या भागातील शेतकऱ्यांकडील ताजा भाजीपाला व फळे यांची मोठ्या शहरांना थेट विक्री करण्याची मोठी योजना व तशी वाटचाल सुरू केली आहे. योजनेची अंमलबजावणी सुरू ‘किसान कनेक्ट’ च्या कामांची अंमलबजावणी सुरूही झाली आहे. सध्या राहाता व श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांचे संपर्कजाळे (नेटवर्क) तयार करण्यात आले आहे. श्रीरामपूर एमआयडीसी व राहता तालुक्यातील प्रवरा फळे व भाजीपाला प्रक्रिया सहकारी संस्थेच्या खडकेवाके येथील प्रक्रिया केंद्रात फळे व भाजीपाला संकलन, प्रतवारी, पॅकिंग केंद्राची सुविधा उभारण्यात आली आहे. या उपक्रमामुळे लॉकडाऊनच्या संकटमय काळात परिसरातील शेतकऱ्यांना जागेवरच बाजारपेठ तयार झाली आहे. शिवाय त्यांना समाधानकारक दरही मिळण्याची संधी चालून आली आहे. शेतकऱ्यांकडून माल घेतल्यानंतर त्यांचे ‘पेमेंट’ थेट बँकखात्यात वर्ग करण्यात येते. उल्लेखनीय विक्री सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे व पुणे या शहरांतील ग्राहकांना थेट विक्री होत आहे. लॉकडाऊनमुळे घराबाहेर जाण्यास मर्यादा येत असल्याने शहरवासीयांना थेट त्यांच्या दारात सुरक्षित अंतर पाळून सेवा मिळत असल्याने ते समाधानी आहेत. विक्रीचे दर हे नेहमीच्या बाजारमूल्यांनुसार ठेवले आहेत. यासाठी ‘किसान कनेक्ट’ हा ब्रॅंड निश्चित केला आहे. सध्या कंपनीच्या सुमारे १५० सभासदांचा थेट विक्रीत सहभाग आहे. आत्तापर्यंतच्या कालावधीत मिळून सुमारे २२० टनांपर्यंत विक्री झाली आहे. त्यातून ९५ लाख रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होऊन ती एक कोटीपर्यंत पोचते आहे. कांदा, टोमॅटो, भेंडी, काकडी, मिरची, लसूण, पालक, मेथी, कोथिंबीर आदी भाज्यांसोबत खरबूज, कलिंगड, आंबा, चिकू, द्राक्षे व सफरचंदे आदी फळांचा विक्रीत समावेश आहे. असे केले कामांचे नियोजन नवी मुंबईतील नेरूळ येथे ‘किसान कनेक्ट’ कंपनीने कार्यालय सुरु केले आहे. ग्राहकांकडून नोंदणी (ऑर्डर) घेणे व त्यांच्यापर्यंत मालाचा वेळेवर पुरविणे करणे त्यामुळे शक्य झाले झाले आहे. कंपनीने खरे तर लॉकडाऊन होण्याच्या पूर्वीच या विषयावर काम सुरू केले होते. यात मुंबई व ठाणे येथील उपनगरे व निवासी सोसायट्यांना संपर्क साधून ग्राहकांची नोंदणी केली. त्यांच्या शेतमालाच्या गरजा नोंदवून घेतल्या. श्रीरामपूर, राहता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतांना समक्ष भेटी दिल्या होत्या. त्यांच्याकडील फळे व भाजीपाल्याची माहिती संकलित केली होती. शेतकऱ्यांना देणार प्रशिक्षण किसान कनेक्ट मार्फत भाजीपाला उत्पादकांना येत्या काळात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. करार पद्धतीने शेतीची संकल्पना राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना चांगला मोबदला देऊन योग्य किमतीमध्ये चांगला शेतमाल ग्राहकांच्या घरात पोचविण्याचा मुख्य उद्देश ‘किसान-कनेक्ट’चा असल्याचे प्रकल्प संस्थापक सारंगधर निर्मळ यांनी सांगितले. सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना या उपक्रमाद्वारे व्यावसायिक शेतीकडे वळविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक निर्मळ यांनी सांगितले. संपर्क- किसान कनेक्ट- ९१४६४६४७५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT