नगर जिल्ह्यातील चिंचोली (ता. राहुरी) परिसरातील दहा गावांतील शेतकरी गटांनी एकत्र येऊन साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. सध्या या शेतकरी कंपनीची दोन खते-बियाणे विक्री केंद्रे सुरू असून दीड कोटीची वार्षिक उलाढाल होते. शेतीसाठी निविष्ठांची स्वस्तामध्ये उपलब्धता, पीककर्जासाठी मदत आणि पुढे उत्पादित धान्यांची खरेदी अशा तिन्ही टप्प्यावर पाचशे सभासद शेतकऱ्यांना कंपनीने आर्थिक आधार दिला आहे. शेतकऱ्यांसोबतच कंपनीचीही वाढ होत असून, पहिल्या वर्षी पाच लाख असलेली आर्थिक उलाढाल आता तीन कोटीपर्यंत पोचली आहे. शेतकरी कंपनीच्या उत्तम आर्थिक नियोजनातून सभासदांच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. नगर- संगमनेर राज्यमार्गावरील चिंचोली गावचा शिवार सधन. येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत २०१४ मध्ये साईप्रवरा शेतकरी गटाची स्थापना केली. परिसरातील गावांमध्येही असेच शेतकरी गट होते. येथून जवळ असलेल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात विविध कार्यक्रमानिमित्त शेतकरी एकत्र येत. अशाच एका कार्यक्रमात तत्कालीन आत्माचे प्रकल्प संचालक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्या पुढाकाराने परिसरातील अकरा गावांतील शेतकऱ्यांनी साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. हळूहळू शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आता पाचशेपेक्षा अधिक शेतकरी कंपनीशी जोडले गेले आहेत. भागभांडवलाची उभारणी कंपनीच्या स्थापनेनंतर दहा गावांतील साधारण तीनशे शेतकऱ्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे तीन लाखाचे भागभांडवल उभे केले. त्याचवर्षी कृषी विभागाच्या आत्माअंतर्गत स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पातून विविध यंत्रांच्या खरेदीसाठी १८ लाखांचे साहित्य मंजूर झाले. त्यातील तेरा लाख अनुदान मिळाले असून, उर्वरित ५ लाखांचा शेतकरी वाटा कंपनीने भरला. त्यासाठी आवश्यक रक्कम काही शेतकरी व संचालक मंडळाने स्वतःच्या ऐपतीनुसार जमा केली. सर्व शेतकऱ्यांनी जबाबदारी उचलत आर्थिक हातभार लावल्यामुळे कंपनीला विविध यंत्रणा खरेदी करता आली. खेळत्या भांडवलासाठी नाबार्डकडून कर्ज साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीने २०१६ पासून शेतकऱ्यांकडून धान्याची खरेदी सुरू केली. बाजारात व्यापाऱ्यांकडून धान्य विक्रीसाठी रोख पैसे मिळतात. परिणामी कंपनीकडून शेतकऱ्यांची रोखीची अपेक्षा होती. त्यासाठी सुरुवातीला संचालक मंडळाने साधारण ३० लाखाचे भांडवल स्वतः उभे केले. तसेच नाबार्डकडून दीड वर्षाच्या हमीवर ३० लाखाचे कर्ज घेतले. दीड वर्षानंतर परतफेड करून पुन्हा आता ३५ लाखांचे कर्ज घेतले आहे. भांडवलाची उपलब्धता ही बाब अत्यंत महत्त्वाची होती. त्यात संचालक मंडळ, शेतकरी आणि नाबार्ड संस्थेची मदत झाली. साईप्रवरा कंपनीचा नुकताच दोन पुरस्काराने गौरव झाला आहे. शेतकऱ्यांना मिळतो थेट आर्थिक फायदा
पतसंस्थेचा कर्जरूपी आधार हंगामामध्ये शेतकऱ्यांना पेरणी आणि लागवडीसाठी भांडवलाची गरज लागते. ती भागवण्यासाठी साईप्रवराच्या सभासदांना राहुरीतील अर्बन मल्टीस्टेट पतसंस्थेद्वारे कर्ज उपलब्ध केले जाते. कंपनीने दिलेल्या सभासद ओळखपत्रावर खते, बियाणे व कीडनाशकांच्या खरेदीसाठी साधारण तीस हजार रुपयापर्यंतचे पीककर्ज त्वरित उपलब्ध होते. ती रक्कम साईप्रवराच्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते. हंगामानंतर संबंधित शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी झाल्यानंतर पतसंस्थेचे कर्ज फेडले जाते. या कर्जासाठी सहा महिन्यांची मुदत असते. निविष्ठांची उपलब्धता, खरेदीसाठी कर्ज आणि उत्पादित शेतीमालाची पुन्हा खरेदी अशा तिन्ही टप्प्यावर शेतकऱ्यांना मदत करणारी नगर जिल्ह्यामधील एकमेव शेतकरी उत्पादक कंपनी असल्याचे असे राहुरी येथील आत्माचे तालुका व्यवस्थापक धीरज कदम यांनी सांगितले. प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व ः चिचोंलीसह परिसरातील गंगापुर, संक्रापूर, पिंपळगाव, डवणगाव, आंबी, केसापूर, तांभेरे, तांदूळनेर व कोल्हापखुर्द या गावांतील शेतकरी गट एकत्र येत साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. संचालक मंडळातही प्रत्येक गावाला प्रतिनिधित्व देत एका शेतकऱ्याचा समावेश केला जातो. सध्या अशोक गागरे (अध्यक्ष), सोपान सिरसाठ (उपाध्यक्ष), दादासाहेब मेहेत्रे (सचीव) असून, संचालक मंडळात संभाजी नन्नोर, नंदकिशोर मुसमाडे, संजय जगताप, रायभान जाधव, राजेंद्र वडितके, कुंडलिक खपके, बेबीताई गागरे यांचा समावेश आहे. कंपनीच्या व्यवस्थापनासाठी सुनील साबळे हे व्यवस्थापक नियुक्त केले आहेत. साईप्रवरा कंपनीची उद्दिष्टे
आगामी नियोजन
स्वस्तामध्ये निविष्ठा उपलब्धता, उत्पादनाची बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदीसाठी प्रयत्न यातून गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचा विश्वास तयार होत आहे. कंपनीचा, पर्यायाने सभासद शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचाही विचार प्राधान्याने केला जात असल्याने साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनीच्या सभासदांची संख्या वाढत आहे. या शेतकऱ्यांची बाजारात पत निर्माण करण्यात यश मिळत असल्याने कंपनीचा उद्देश सफल होत आहे. शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याने कंपनी स्थापनेचे समाधान आहे. -अशोक विश्वनाथ गागरे, ९९२२२९४१४९ (अध्यक्ष, साईप्रवरा शेतकरी उत्पादक कंपनी, चिंचोली ता. राहुरी जि. नगर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.