कोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद विठ्ठल सोळंके यांनी शेतीला पशुपालनाची जोड दिली. या व्यवसायातून अपेक्षित आर्थिक नफा आणि शेतीसाठी पुरेसे शेणखत मिळते. शेती विकासाच्या बरोबरीने येत्या काळात दूध डेअरी आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनाचे त्यांनी नियोजन केले आहे. कोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) गावशिवार तापी नदीकाठी आहे. केळीसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. काळी कसदार, पाण्याचा निचरा होणारी जमीन या भागात आहे. कूपनलिकांना पुरेसे पाणी असल्याने परिसरातील शेती बारमाही हिरवेगार असते. याच गाव शिवारात देवानंद सोळंके यांची वडिलोपार्जित २८ एकर जमीन आहे. शेतात दोन कूपनलिका आहेत. साधारणपणे २८ एकरापैकी सुमारे १० एकर जमीन त्यांनी लागवडीखाली आणली आहे. उर्वरित जमीन टेकड्या, झुडपांमुळे पडीक आहे. दहा एकर जमीन त्यांनी यंत्रणेच्या साह्याने सपाट करून लागवडयोग्य बनविली. त्यासाठी त्यांना मोठा खर्च करावा लागला होता. शेतीला पशुपालनाची जोड
दुधाळ म्हशींचे संगोपन
थेट ग्राहकांना दुधाची विक्री गाव परिसरात म्हशींचा अद्ययावत गोठा नाही. त्यामुळे परिसरातील ग्राहकांच्याकडून म्हशीच्या दुधाला चांगली मागणी असते. ग्राहकांना दुधाची जागेवरच विक्री केली जाते. याचबरोबरीने विदगाव, कोळन्हावी, पुनगाव, डांभुर्णी येथील चहा व्यावसायिक, घरगुती वापरासाठी ग्राहक गोठ्यावर येऊन दूध खरेदी करतात. ग्राहकांना ६० रुपये प्रति लिटर या दराने २०० लिटर दुधाची विक्री होते. दुधाचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांची संख्या वाढत आहे. यामुळे घरोघरी जावून किंवा पूर्ण दूध डेअरीत विक्री करण्याची गरज नाही. ग्राहकांना देऊन उरलेले ५० लिटर दूध धानोरा (ता.चोपडा) येथील डेअरीला दिले जाते. सध्या देवानंद यांच्याकडे मावा, पेढा तयार करण्याची यंत्रणा आहे. पुढे आवश्यक आधुनिक यंत्रणा घेऊन डेअरीत उपपदार्थांच्या विक्रीचे नियोजन त्यांनी केले आहे. जमीन सुपीकतेवर भर पशुपालनामुळे देवानंद यांना शेतीसाठी पुरेसे शेणखत उपलब्ध होते. सुपीकता जपण्यासाठी केळी, कपाशी लागवडीपुर्वी दरवर्षी पुरेसे शेणखत जमिनीत मिसळले जाते. दरवर्षी १५० ट्रॉली शेणखत मिळते. यातील ५० ट्रॉली शेणखताची २२०० रुपये प्रति ट्रॉली या दराने विक्री केली जाते. उरलेले १०० ट्रॉल्या शेणखत स्वतःच्या शेतीमध्ये वापरले जाते. यामुळे जमीन सुपीक झाली, त्याचबरोबरीने कापूस, केळीचेही अपेक्षित उत्पादन मिळते. शेतीच्या व्यवस्थापनासाठी दयानंद यांच्याकडे ट्रॅक्टर, बैलजोडी आहे. तसेच चार मजूर आहेत. दरवर्षी फेब्रुवारीत तीन एकरांत केळीची लागवड असते. केळीची २२ किलोची रास मिळते. पूर्वहंगामी कापसाची चार एकरांत लागवड असते. कापसाचे एकरी १३ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. कापूस, केळीला ठिबक सिंचन केले आहे. यंदा अतिपाऊस व गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादकता एक ते दीड क्विंटलने कमी झाली आहे. बोंड अळीचे संकट लक्षात घेऊन दयानंद यांनी कापूस पीक काढून उरलेल्या पऱ्हाटी जाळल्या आहेत. रिकाम्या झालेल्या क्षेत्रात हरभरा, गव्हाची पेरणी केली आहे. रब्बी पिकानंतर फेब्रुवारी, मार्चमध्ये केळीची लागवड केली जाते. शेती आणि पशुपालन व्यवसायात देवानंद यांना पत्नी सौ. सोनाली यांची चांगली साथ मिळाली आहे. संपर्क ः देवानंद सोळंके, ७७७३९०८९९९c
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.