सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची बाब झाली आहे. सातारा जिल्ह्यातील विडणी येथील अजित अभंग यांनी हीच गरज व संधी ओळखून चारा पिकांची कुट्टी करणारी आधुनिक यंत्रे घेत त्यात गुंतवणूक केली आहे. आपल्या दुग्धव्यवसायासाठी त्याचा वापर होतोच. शिवाय शेतकऱ्यांकडे जाऊन मका कापणी, कुट्टी करणे व त्याच्या बॅग्ज भरून देण्यापर्यंतची सेवा देण्याचा व्यवसाय त्यांनी शोधला व सुरू केला आहे. आदर्श दुग्ध व्यवसायातही अभंग यांनी नाव मिळवले आहे.
सातारा जिल्ह्यात सर्वाधिक फलटण तालुक्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते. या तालुक्यातील विडणी हे साधारण १८ हजार लोकसंख्येचे गाव आहे. पाण्याची उपलब्धतता असल्याने ऊस तसेच दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याच गावातील उच्चशिक्षित अजित हरिदास अभंग हे प्रगतशील शेतकरी आहेत. एमए चे शिक्षण पूर्ण केल्यावर नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती आणि वडिलोपार्जित दुग्ध व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या छोटेखानी असलेल्या गोठ्यात चार गायींचे संगोपन केले जायचे. त्यावेळी मुक्त संचार गोठ्याची संकल्पना फारशी रुजली नव्हती. त्यामुळे बंदिस्त गोठा पद्धतीचा वापर व्हायचा. हा व्यवसाय वाढवायचा या दृष्टीने अजित यांनी टप्प्याटप्प्याने गाईच्या संख्येत वाढ करण्यास सुरुवात केली. मुक्तसंचार गोठा गायींचे दूध फलटण येथील गोविंद मिल्क डेअरीला दिले जायचे. येथील सरव्यवस्थापक डॉ. शांताराम गायकवाड यांनी मुक्त संचार गोठ्याची समजावून दिली. कमी श्रम, जनावरांना कमी व्याधी, वाढीव दूध उत्पादन आदी फायदे असल्याने मुक्त संचार गोठा करण्याचा निर्णय घेतला. राहत्या घराशेजारीच ८० बाय ४० फुटाचा सोयीसुविधांनी युक्त व खेळती हवा राहील असा गोठा बांधला केला. सध्या १२ गायी व सात कालवडी आहेत. बहुतांश सर्व गायी एचएफ जातीच्या आहेत. दोन म्हशींचेही संगोपन केले जात आहे. जनावरांसाठी पाण्याची सोय, उन्हाळ्यात गारवा राहावा यासाठी फॉगर्स, फॅन्स बसविण्यात आले आहेत. आपल्या सहा एक जमिनीत दोन ते अडीच एकरांत पाच ते सहा प्रकारचा चारा घेण्यात येतो. उर्वरित उसाचे पीक असते. चाऱ्यासाठी मका, कडवळ या पिकांचे वर्षभराचे नियोजन केले जाते. दुग्ध व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी
मूरघास निर्मिती मुक्तसंचार गोठा उभारल्यानंतर चाऱ्यावरील खर्च कमी व्हावा तसेच जनावरांना वर्षभर पोषक चारा मिळावा यासाठी अजित यांनी मक्यापासून मूरघास तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी २७ बाय २० फूट आकाराचा खड्डा काढून त्याचे बांधकाम केले आहे. या युनिटची क्षमता ६० टनाची आहे. वर्षातून दोनवेळा मूरघास तयार केले जाते. दिवसातून दोन वेळा जनावरांना त्याचा वापर केला जातो. व्यवसायाची संधी शोधली
वीस लाखांची गुंतवणूक आता शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मोठ्या क्षमतेचा ट्रॅक्टर (७५ एचपी) व आधुनिक कटरची खरेदी केली आहे. यासाठी २० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. कटरची किंमत साडेपाच लाख रुपयांपर्यंत आहे. पूर्वीच्या कटरची क्षमता तासाला १० ते १५ टन होती. सध्याच्या कटरची क्षमता तासाला २५ टन कुट्टी करण्याची आहे. मदत व मार्गदर्शन आई कांताबाई, वडील हरिदास यांच्यासह पत्नी मोनाली, भावजय ज्योती यांची मदत होत असते. ‘गोविंद मिल्क'चे डॉ. शांताराम गायकवाड, विकास जाधव, दत्तात्रय सोनकांबळे यांचेही सहकार्य लाभले आहे. भविष्यात गोठ्याचा विस्तार करण्याचा विचार असून सुमारे ५० गायींच्या संगोपनाचे उद्दिष्ट असल्याचे अजित सांगतात. संपर्क- अजित अभंग, ९५७९६८३२४५
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.