चाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रीय कांदा, लसूण संशोधन केंद्र आणि कला बायोटेक यांनी हवेच्या संतुलित पुरवठ्यावर तापमान नियंत्रण करणारे बहुमजली कांदा साठवणूक तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याच्या विविध टप्प्यावर तीन वर्षे चाचण्या घेण्यात आल्या. १२० दिवसांच्या साठवणूक प्रयोगानंतर पारंपारिक कांदा साठवणुकीमध्ये कांद्याचे होणारे नुकसान १५ टक्क्यांनी कमी होत असल्याचे समोर आले. तसेच कांदा सडणे आणि कोंब फुटणे हे प्रकारही टळतात. हे तंत्रज्ञान वैयक्तिक शेतकऱ्यांसह, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, उद्योजक यांच्यासाठी उपयोगी ठरणार आहे. कांद्याच्या मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनासाठी रब्बी हंगामातील साठवणूक केलेला कांदा महत्त्वाची भूमिका बजावतो. यासाठी अनेक शेतकरी व व्यापाऱ्यांनी स्वतःच्या कांदा चाळी उभ्या केल्या आहेत. मात्र, नैसर्गिक आपत्ती, वादळ आणि जास्त पर्जन्यमान यामुळे पारंपारिक कांदा चाळीमध्ये कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. कांदा साठवणुकीतील नुकसान कमी करण्यासाठी राजगुरुनगर येथील कांदा व लसूण संशोधन संस्थेतील डॉ. कल्याणी गौरीपट्टी, डॉ. राजीव काळे, डॉ. मेजर सिंग यांनी कला बायोटेक प्रा. लि. यांच्यासह नियंत्रित वातावरणात कांदा साठवणुकीचे नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. नैसर्गिक हवा खेळती राहणाऱ्या कांदाचाळीमध्ये साठवणुकीसाठी पोषक वातावरण नियंत्रण राहण्यात अनेक अडचणी येतात. या नवीन तंत्रज्ञानावर आधारित साठवणगृहात बंदिस्त आणि नियंत्रित वातावरण ठेवले जाते. त्यात २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, ६० ते ६५ टक्के आर्द्रता आणि हवा खेळती राहण्यासाठी रचना केली आहे. यामुळे कांदा साठवणुकीमध्ये कांद्याचे कोंब येणे, सडणे व वजनातील घट याचे प्रमाण अत्यल्प राहत असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. दृष्टीक्षेपात कांदा पीक भारतात सुमारे १३ लाख हेक्टरवर २२८ लाख टन कांद्याचे उत्पादन होते. वार्षिक उत्पादनात, ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात येणारे खरीप कांद्याचे उत्पादन १५ ते २० टक्के, जानेवारी- फेब्रुवारी मध्ये येणारे रांगडा कांद्याचे उत्पादन २० टक्के व एप्रिल मे महिन्यात रब्बी कांद्याचे उत्पादन ६०-६५ टक्के असते. मे महिन्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत कुठलाही कांदा काढला जात नाही. त्यामुळे जून ते ऑक्टोबरपर्यंत कांद्याची मागणी ही साठवलेल्या कांद्यातून पुरवली जाते. कांदा साठवणूक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने उन्हाळ्यात कांद्याच्या किमती कमी होतात. बऱ्याचदा सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान कांद्याच्या किमती वाढल्याचे दिसून येते. अशी आहे अत्याधुनिक कांदा चाळ
५० टनांच्या चाळीसाठी ३५ लाखांचा खर्च
५० टन क्षमतेच्या कांदाचाळीसाठी ३५ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च पाच वर्षात वसूल होऊ शकतो असा दावा संशोधकांनी केला.यात कांद्याबरोबर लसूण देखील साठवणे शक्य. सध्या प्रयोग सुरु आहेत. विविध फळे, भाजीपाल्यासाठीही या साठवणगृहाचा उपयोग शक्य असून, त्यावर संशोधन सुरु आहे. असा आहे साठवणूक आणि हाताळणी खर्च एक किलो कांदा एका महिन्यासाठी साठविण्यास ६० पैसे खर्च येतो. म्हणजेच सहा महिन्यांसाठी प्रति किलो ३ रुपये ६० पैसे एवढा खर्च येतो. साधारण ७ ते १२ रुपये प्रति किलोचा कांदा सहा महिने साठवून योग्य दर येताच शेतकरी विकू शकतो. वैशिष्ट्ये
विविध यंत्रणांकडून तंत्रज्ञानाचे कौतुक
शासनाच्या अनुदानाची गरज पारंपारिक कांदाचाळींप्रमाणे नवीन तंत्रज्ञानावर आधारित बहुमजली कांदाचाळीसाठी शासकीय अनुदान योजनेची गरज आहे. यामध्ये कृषी, पणन, नाबार्ड अशा विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने योजना आखल्यास आधुनिक कांदा चाळ तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये रुजण्यास मदत होईल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले. २००५-०६ मध्ये कांदा साठवणुकीसाठी विविध साठवणूक क्षमतेच्या कांदाचाळी उभारण्यात आल्या होत्या. कांदा चाळींची कार्यक्षमता वाढवण्याच्या उद्देशाने कांदा लसूण संशोधन संस्थेने संशोधन केले आहे. पारंपारिक कांदा चाळ आणि शीतगृह या दोन्हींमधील साधे सोपे आणि परवडणारे तंत्रज्ञान ठरू शकते. याचा लाभ व्यक्तिगत शेतकरी व शेतकरी कंपन्यांना नक्कीच होईल. - सुनील पवार (कार्यकारी संचालक, राज्य कृषी पणन मंडळ, पुणे.) संपर्क : (०२१३५) २२२०२६ डॉ. राजीव काळे, ९५२१६७८५८७. (कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरुनगर, पुणे.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.