लॉकडाऊनच्या काळात वर्णा (ता.जिंतूर,जि.परभणी) येथील वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीने सभासद शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळांची थेट विक्री व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे भाजीपाला,फळांची नासाडी टळली आणि ग्राहकांनाही ताजा भाजीपाला मिळाला. थेट विक्रीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दरही मिळत आहे. गेल्या वीस दिवसात कंपनीने सुमारे ५ हजार ७८० किलोपेक्षा जास्त भाजीपाला, फळांची विक्री केली. यातून सव्वा लाख रुपयांची उलाढाल झाली. याचबरोबरीने कंपनीने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत वर्णा येथे खरेदी केंद्र सुरू केल्यामुळे तूर आणि हरभरा उत्पादकांची सोय झाली आहे.
कृषी विभागाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी प्रकल्पांतर्गत वर्णा (ता.जिंतूर) येथील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत १ मे, २०१५ रोजी वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्युसर कंपनीची सुरवात केली.परिसरातील सहा गावातील ३१९ शेतकरी कंपनीचे सभासद आहेत. कंपनीतर्फे सभासदांच्या शेतमालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबिले जातात. यामध्ये बीजोत्पादन, बियाणे विक्री, धान्य स्वच्छता व प्रतवारी करून विक्री, किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत शेतमालाची खरेदी आदी उपक्रमांचा समावेश आहे. गतवर्षीच्या जानेवारी महिन्यापासून कंपनीतर्फे परभणी शहरात संत शिरोमणी सावता माळी आठवडे बाजाराचे आयोजन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना थेट भाजीपाला, फळे विक्रीची व्यवस्था तयार झाली. मात्र गेल्या महिनाभरात लॉकडाऊनमुळे आठवडे बाजार बंद आहेत. संचारबंदीमुळे शहरातील ग्राहकांना भाजीपाला उपलब्ध होत नाही. त्यामुळे कंपनीने सभासद शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळांची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना भाजीपाला,फळे विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा निबंधक (सहकारी संस्था) मंगेश सुरवसे,आत्मा चे उपसंचालक के.आर.सराफ यांच्यासह पणन मंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पंकज चाटे यांच्या संकल्पनेतून परभणी शहरातील विविध नागरी वसाहतीमध्ये वर्णेश्वरतर्फे शेतकरी ते ग्राहक भाजीपाला विक्री हा उपक्रम शनिवारी (ता.४ एप्रिल) पासून सुरु करण्यात आला.
विक्रीचे नियोजन वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष दिलीप अंभुरे आणि सचिव माणिक अंभुरे हे दोघे जण कंपनीचे सभासद असलेल्या वर्णा, कडसावंगी, चांदज, बोरी, कौसडी, नागठाणा, गोंधळा आदी गावातील ५० भाजीपाला उत्पादकांकडून भाजीपाला, फळे संकलित करून वाहनाव्दारे परभणी शहरात आणतात. दररोज सकाळी ७ ते ११ या वेळेत परभणी शहरातील शिवाजी नगर आणि कल्याण नगर परिसरात स्टॅाल लावून भाजीपाला, फळांची विक्री केली जाते. विक्रीच्या नियोजनापूर्वी संबंधित वसाहतीमधील नागरिकांच्या व्हॅाट्सअप ग्रुपव्दारे विक्रीबाबत सूचना दिली जाते.भाजीपाला विक्री स्टॅाल तसेच हमीभाव खरेदी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाते. भाजीपाला, फळे विक्रीतून लाखांवर उलाढाल
‘‘ शेतकऱ्यांना शेतमाल विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीकडून सातत्याने प्रयत्न केले जातात. लॉकडाऊनच्या काळात बाजारात मंदी असताना कंपनीचे हमीभाव केंद्र तसेच थेट भाजीपाला,फळे विक्रीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टळले आहे.‘‘ - दिलीप अंभुरे, ९६५७९६१६३५ (अध्यक्ष, वर्णेश्वर अॅग्रो प्रोड्यूसर कंपनी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.