उन्हाळ्यात जनावरांचे ठेवतो चोख व्यवस्थापन
विदर्भात हवामान, पाणी, चारा, सहकारी उद्योग आदी विविध बाबींचा विचार करता पशुपालन करणे तशी सोपी गोष्ट नाही. मात्र चितलवाडी (ता. तेल्हारा, जि. अकोला) येथील संजय इंगळे यांनी दुग्ध व्यवसाय विस्तारला आहे. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवत आज लहान-मोठी धरून त्यांच्याकडे शंभराहून अधिक जनावरे झाली आहेत. दुधाची ते स्वतःच्या दोन विक्री केंद्रांमधून थेट विक्री करतात. उन्हाळ्यात अकोला जिल्ह्यात तापमानात प्रचंड वाढ होते. अशा परिस्थितीत दुग्ध व्यवसाय टिकवून ठेवणे हे अत्यंत कठीण होऊन जाते. मात्र इंगळे यांनी या समस्येवर तोडगा काढत व्यवसायात सातत्य टिकवून ठेवले. उन्हाळ्याच्या काळात दुधात घट येऊ नये, जनावरांना वाढलेल्या उष्णतेचा फटका बसू नये यासाठी विविध उपाययोजना ते करतात. त्या पुढीलप्रमाणे.
दुधाळ जनावरांना एक वेळ हिरवा चारा देण्यास प्राधान्य दिले जाते. यासाठी लागणाऱ्या चाऱ्याचे आधीच नियोजन केले जाते.जनावरांसाठी लागणारा कोरडा चारासुद्धा साठवलेला असतो.जनावरांना उन्हाळ्यात एकवेळ हिरवा चारा मिळाल्यास त्यांच्या शरीरातील तापमान संतुलित ठेवता येते. दुधाची चव कायम राहते.उन्हाळ्यात सर्वसाधारणपणे जनावरांची दूध देण्याची क्षमता कमी झालेली पाहण्यास मिळते. मात्र इंगळे यांच्याकडील व्यवस्थापनामुळे दुधाचे प्रमाण कमी झाल्याचा प्रकार पाहण्यास मिळत नाही. उन्हाळ्याच्या दिवसात दुधाळ जनावरांना दिले जाणारे पशुखाद्य नेहमीपेक्षा थोडे अधिक प्रमाणात देण्यात येते.गोठ्यातील तापमान संतुलित ठेवण्यासाठी सर्वत्र फॉगर्स लावले आहेत. ही यंत्रणा सकाळी ११ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वंयचलित पद्धतीने कार्य करीत असते. दहा मिनिटे यंत्रणा सुरू होते आणि त्यानंतर अर्धा तास बंद राहते. अशा पद्धतीमुळे जनावरांना उष्णतेचा त्रास होत नाही.गोठ्याबाहेर ४५ अंश किंवा त्यापेक्षा अधिक तापमान असले तरी गोठ्यात ते २५ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहते.एकवेळ जनावरे स्वच्छ धुतली जातात. गोठा साफ ठेवला जातो.उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची अधिक गरज भासते. यासाठी गोठ्यात जनावराच्या गव्हाणीशेजारीच चोवीस तास पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. जनावर गरजेनुसार पाणी पिऊ शकते. ते पाणी संपले की तेवढेच पाणी पुन्हा यंत्रणेद्वारे भरले जाते.उन्हाळ्यात जनावरांची पचनक्रिया चांगली राहण्यासाठी एकवेळ २५ ग्रॅम खाण्याचा सोडा व एकवेळ मिठाचा पशुखाद्यासोबत वापर होतो. यामुळे पोट फुगण्याचा प्रकार घडत नाही. उन्हाळ्यात दूध निर्मिती प्रक्रियेवर परिणाम झाला तर ते जनावर पूर्ववत दूध द्यायला तीन ते चार दिवस वेळ घेते. दूध कमी मिळाल्यास व्यवसायाचे गणितचुकते. मात्र चोख व्यवस्थापनामुळे तशी अडचण इंगळे यांना जाणवत नाही. संपर्क : संजय इंगळे, ९६५७२७६६६५