Study of Weather : परवा २१ मार्चला आपण जागतिक वन दिन, काल २२ मार्चला जागतिक जल दिन साजरा केला, तर आज जागतिक हवामानशास्त्र दिन आहे. वन, जल अन् हवामान यांचा फारच घनिष्ठ संबंध आहे. आपल्या देशाचा विचार करता वन, जल आणि हवामानाबाबत फारच बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. पर्यावरण संतुलनासाठी किमान ३३ टक्के क्षेत्र हे वनाखाली असले पाहिजे, असे राष्ट्रीय वन धोरण सांगते.
भारतात मात्र वनाखालील क्षेत्र जेमतेम २४ टक्के असून, विविध विकासकामांमुळे तसेच वनांवरील वाढत्या अतिक्रमणामुळे वन क्षेत्र दिवसेंदिवस घटत आहे. महाराष्ट्रात तर केवळ १५-१६ टक्के एवढे कमी क्षेत्र वनाखाली आहे. ५० वर्षांपूर्वी सह्याद्रीचा ६७ टक्के प्रदेश जंगलाने व्यापला होता. आता सह्याद्रीत केवळ ३७ टक्के जंगल शिल्लक आहे.
पश्चिम घाटासह देशभर सर्वच जंगलांचा असाच ऱ्हास सुरू आहे. मॉन्सूनचा पाऊस हाच एकमेव पाण्याचा स्रोत आहे. अर्थात, मॉन्सूनमुळेच जलसाठ्यांत आणि भूगर्भात पाणी उपलब्ध होते. असे असताना पडलेला पाऊस अडवून तो भूगर्भात जिरविण्यासाठींच्या योग्य पर्यायांचा वापर आपल्याकडे होत नाही.
त्यामुळे अधिक पाऊसमान काळात बहुतांश पाणी वाहून जाते आणि आपल्याला पाणीटंचाई जाणवते. कमी पाऊसमान काळात तर अर्ध्याहून अधिक देशाला तीव्र पाणीटंचाईसह दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. या वर्षी तर देशभरात पर्जन्यछायेच्या प्रदेशात जलसाठे आटले आहेत. भूगर्भातील पाणीपातळीही खोल गेली असल्याने जलसंकट अधिक गंभीर होतेय.
सर्वाधिक प्रदूषित देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या ५० प्रदूषित शहरांपैकी ४२ शहरे भारतातील आहेत, याचे आपल्याला काहीही वाटत नाही. वनक्षेत्र अधिक असलेल्या ठिकाणी पर्यावरण संतुलन राखले जाते. घनदाट जंगले ‘कार्बन सिंक’ म्हणून काम करतात. अशी जंगले अतिरिक्त कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन साठवितात.
त्यामुळे पर्यावरण प्रदूषण कमी होते. एवढेच नव्हे तर वनोपजांतून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती देखील होते. या सर्व बाबी विचारात घेता वनक्षेत्रातील अतिक्रमण आपल्याला थांबवावे लागेल, अनधिकृत वृक्षतोड कुठेही होणार नाही, ही काळजी घ्यावी लागेल. शक्य असेल तिथे वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे लागेल.
वनक्षेत्र वाढल्याने पाऊस चांगला पडेल. अशा पाण्याचे संवर्धन करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर केला तर पाणीटंचाई दूर होऊ शकते. हे करीत असताना जलस्रोतांचे प्रदूषण कमी करावे लागेल, नैसर्गिक जलस्रोत पुनरुज्जीवित करावे लागतील. वनक्षेत्रात वाढ झाली म्हणजे प्रदूषण कमी होऊन हवामान बदलाचे सध्या बसणारे चटके कमी होतील.
त्याचा सर्वाधिक लाभ शेतीक्षेत्राला होईल. या वर्षी जागतिक वन दिनाचा विषय (थीम) आहे, जंगले आणि नवीनता याच चांगल्या जगासाठीचे उत्तम पर्याय आहेत. त्यामुळे नवनवीन कल्पना, उपक्रमांवर भर देत वृक्ष लागवड-संवर्धन करून जैवविविधतेचा होणारा ऱ्हास कमी करून हवामान बदलावर मात करायची आहे.
जागतिक जल दिनाचा विषय हा, ‘शांततेसाठी पाण्याचा वापर’ असा आहे. तिसरे महायुद्ध झाले तर ते पाण्यासाठी होईल, असे बोलले जाते. पाणीटंचाई काळात जिल्हा, राज्य, देशांतर्गत वादविवाद वाढतात. अशावेळी या तिन्ही पातळ्यांवर पाण्यासाठी एकमेकांना सहकार्य केले तेव्हाच पाणी शांततेचे माध्यम बनू शकते, हा संदेश या वर्षीच्या जलदिनी जगाला द्यायचा आहे.
हवामान बदलाबाबत चर्चा खूप झाल्या, होत आहेत. या वर्षी संपूर्ण जगाने प्रत्यक्ष कृतीतून हवामान बदलावर मात करायची, अशी संकल्पना (थीम) आहे. या तिन्ही थीम जगाने गांभीर्याने घेऊन त्यावर वर्षभर सकारात्मक काम होईल, हीच अपेक्षा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.