जनुकीय बदलाबरोबर तणनाशक सहनशील (एचटी - हर्बीसाईड टॉलरंट) कापसाच्या वाणांना देशात परवानगी नाही. अशा वाणांना ‘जीईएसी’ तसेच ‘आयसीएआर’ने देखील मान्यता दिलेली नाही. असे असताना एचटी बियाणे देशात अनधिकृतरीत्या केवळ घुसलेच नाही तर लाखो पाकिटे विविध राज्यांमध्ये यावर्षीच्या हंगामात विकली आहेत. राज्यातील एकट्या यवतमाळ जिल्ह्यात २५ लाख पाकिटे विकली गेली असल्यास देश पातळीवरील बेकायदेशीर पसरलेल्या कापसाच्या क्षेत्राचा अंदाज यायला हवा. या देशाच्या नियामक संस्थेच्या मंजुरीविना तसेच सर्वोच्च संशोधन संस्थेच्या परवानगीविना एखादे नवे तंत्रज्ञान, जे येथील पर्यावरण, जैवविविधता, लोकांचे आरोग्य यासाठी धोकादायक आहे, त्याची देशातील एवढी व्याप्ती धक्कादायक म्हणावी लागेल. या देशात बीटी कापसाला परवानगी मिळण्याच्या दोन वर्षे अगोदरच त्याचे बियाणे बेकायदेशीरपणे गुजरात मध्ये पोचले होते. आत्ताही ‘आरआरएफ’ (राउंडअप रेडी फ्लेक्स) हे एचटी कापूस बियाणे आंध्र प्रदेश आणि गुजरात राज्यात प्रथम पोचले असून तेथून त्याचा प्रसार देशभर होत आहे. या सर्व प्रकारातील अतिगंभीर बाब म्हणजे सरळ मार्गाने परवानगी देत नसाल तर काय झाले? आम्ही वाकड्या वाटेने अथवा चुकीच्या मार्गाने देशात प्रवेश करू आणि पुढेमागे परवानगी पदरात पाडून घेऊच, हा काही नफेखोर कंपन्यांचा पायंडा हाणून पाडावा लागेल. चिंताजनक बाब म्हणजे काही कंपन्या नफेखोरीसाठी हे करीत असल्यातरी या देशातील संशोधन संस्था, संबंधित राज्यांची सरकारे, केंद्र सरकार काय करीत होते, हा खरा प्रश्न आहे. मोन्सॅंटो कंपनीने तणनाशक प्रतिबंधक कापसाचे आरआरएफ हे वाण विकसित केले आहे. या वाणामध्ये तणनाशकाचा वापर करता येतो. पर्यायाने शेतकऱ्यांचा निंदणी, खुरपणीचा खर्च वाचतो, असा कंपनीचा दावा आहे. सध्याच्या मजूरटंचाईच्या काळात शेतकऱ्यांचा कल या वाणाकडे असला तरी ते पूर्ण चाचण्या आणि रितसर परवानगीअंतीच देशात यायला हवे. या तंत्रात केवळ शेतकऱ्यांचा हिताचा बाऊ केला जात असला तरी अशा वाणामध्ये मोन्सॅंटो कंपनीचेच राउंडअप रेडी हे तणनाशक कापूस उत्पादकांना वापरावे लागेल. त्यातून त्याचा खप वाढून कंपनीला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. विशेष म्हणजे सध्या बीटी वाणं गुलाबी बोंडअळीला मोठ्या प्रमाणात बळी पडत असताना एचटी वाणं तणनाशक सहनशील किती दिवस राहतील, त्यांची तणनाशक सहनशीलता कमी झाल्यावर काय करायचे, या प्रश्नांची उत्तरेही आत्ताच शोधावी लागतील. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशात सध्या इतर पिकांमध्ये तणनाशकांच्या वापरामुळे माती आणि पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले असून त्याचे मानवी आरोग्यासह संपूर्ण जीवसृष्टीवर दुष्परिणाम आढळून येत आहेत. आरआरएफ वाणाचे कापसाच्या इतर वाणांत संक्रमण होण्याचा धोका पण आहे. अशावेळी बेकायदेशीररीत्या घुसलेल्या एचटी बियाण्यांवर नियंत्रण यायलाच पाहिजे. मोन्सॅंटो कंपनी एचटी बियाणे संशोधन संस्थांच्या प्रक्षेत्रावरून बाहेर केल्याची शंका व्यक्त करते, यात कितपत तथ्य आहे अथवा त्यांच्याकडूनच जाणीवपूर्वक या अवैध बियाण्याचा प्रसार करण्यात आला का, या सर्व बाबी स्पष्ट व्हायला हव्यात. यासाठी संबंधित राज्य सरकारांना आदेश दिले आहेत, चौकशी करण्यासाठी पथके नेमले आहेत यावरच अनुक्रमे केंद्र आणि राज्य शासनाने न थांबता या सर्व गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी.