संपादकीय
संपादकीय 
संपादकीय

बीजोत्पादनातून साधा आर्थिक उन्नती

विजय सुकळकर

विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलडाणा. या जिल्ह्याचा बहुतांश भाग हा दुष्काळी आहे, तर काही क्षेत्र खारपाण पट्ट्यात मोडते. पाण्याची कमतरता आणि सिंचनाच्या सोयीसुविधांचा अभावामुळे जिल्ह्यात सोयाबीन, कापसासह अन्नधान्य पिकांची पारंपरिक शेती होते. वाढत्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीतून उत्पादनाची हमी नाही. मिळालेल्या उत्पादनाला योग्य दाम नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही बेताचीच आहे. अशा परिस्थितीमध्ये बुलडाणा जिल्‍ह्यातील देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, चिखली तालुक्यांतील लहान-मोठ्या शेतकऱ्यांनी बीजोत्पादनाची कास धरली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हे तालुके राज्याचे सीड हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्य जालना जिल्ह्यास लागून आहेत. सोयाबीन, कापसासह मिरची, टोमॅटो, वांगी, सिमला मिरची, काकडी अशा अनेक भाजीपाल्यांचे बीजोत्पादन आता बुलडाणा जिल्ह्यात होत आहे.

बीजोत्पादनातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा हमखास स्रोत तर मिळाचा आहे. परंतु यांस लागून इतरही अनेक रोजगाराच्या संधी युवकांना उपलब्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे मराठवाडा, विदर्भातून सध्याच्या दुष्काळी पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर, युवकांचे शहरांकडे स्थलांतर वाढले असताना या जिल्ह्यातून मात्र स्थलांतराला काहीसा ब्रेक लागला आहे. बीजोत्पादनामुळे गावागावांत कुशल मजूर तयार होत असून, त्यांच्या हाताला काम आणि त्यास योग्य दामही मिळत आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने बीजोत्पादनाचे अनेक फायदे आहेत. बीजोत्पादनामुळे उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब तर होतोच शिवाय त्यास काटेकोर नियोजनाची जोडसुद्धा मिळते. बुलडाणा जिल्ह्यातील बीजोत्पादन हे राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय स्तरावरील भाजीपाला बियाणे उत्पादक खासगी कंपन्या शेतकऱ्यांकडून करून घेत आहेत. त्यामुळे या कंपन्या शेतकऱ्यांना बीजोत्पादनातील सर्व तांत्रिक माहिती, प्रसंगी तंत्रज्ञान अवलंबासाठी आर्थिक साह्यही करतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बियाण्यास करारात ठरल्याप्रमाणे संबंधित कंपनीकडून दर मिळतो. त्यामुळे पारंपरिक शेतीमाल उत्पादनाला प्रकर्षाने जाणवत असलेली मार्केट आणि रेटची अनिश्चितता बीजोत्पादन प्लॉटसाठी तरी पूर्णपणे संपुष्टात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात सध्या सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन होत असून, योग्य आर्थिक-तांत्रिक मदत मिळाल्यास हे क्षेत्र दुपटीने वाढू शकते, असे यातील जाणकार सांगतात. अशावेळी खासगी बियाणे उत्पादक कंपन्यांबरोबर कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, महाबीज, राष्ट्रीय बीज निगम यांनी बीजोत्पादनातील संधी, फायदे याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवायला हवे. बीजोत्पादनासंदर्भातील शासनाच्या योजनांची माहिती कृषी विभागाने शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला हवी. बीजोत्पादन प्लॉटला अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तींचाही मोठा फटका बसतो. त्यामुळे उघड्यावरील अथवा शेडनेटमधील बीजोत्पादनास पीकविम्याचा आधार मिळायला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करायला हवा. अत्यंत कमी पाण्यातही योग्य नियोजनाअंती उत्तम बीजोत्पादन होऊ शकते हा बुलडाणा जिल्ह्याने दिलेला संदेश राज्यातील इतर जिल्ह्यातही पोचायला हवा. राज्यात जिल्ह्यानिहाय ‘सीड हब’ उभे राहिल्यास आपली ओळखही आंध्र प्रदेशप्रमाणे ‘सीड कॅपिटल ऑफ इंडिया’ अशी होण्यास वेळ लागणार नाही. .......................

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT