तासगाव, जि. सांगली : तासगाव तालुक्यातील येरळा नदीकाठच्या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून, येरळा काठच्या गावांमध्ये पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. येरळ्यात पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आठ दिवस झाले, मात्र येरळ्यात पाणी सोडण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यामुळे शेकडो एकर बागायत शेती ऐन उन्हाळ्यात धोक्यात आली आहे. दुर्दैवाने राजकीय पातळीवरून मात्र याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे.
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी येरळा नदीत पाणी सोडावे, या मागणीसाठी चार दिवस येरळा पात्रात उपोषण केल्यानंतर महसूल प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्यास लावले. मात्र महसूल अथवा पाटबंधारे प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. परिणामी, दिवसेंदिवस येरळाकाठची स्थिती गंभीर होत आहे.
येरळा नदीत पाणी नसल्याची झळ आता काठावरील गावांना बसू लागली आहे. या नदीतून पिण्याच्या पाण्याची योजना असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे, मात्र गेली दोन वर्षे बलवडी बंधाऱ्याखाली पाणीच येत नाही अशी स्थिती आहे. या वर्षी तर आरफळचे एक दिवस सोडलेले पाणी वगळता पावसाच्या पाण्याशिवाय पाणीच येरळ्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या येरळाकाठच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी येरळ्यातून पाणीपुरवठा योजना करून करून पाणी दूर अंतरावर नेले आहे. तेही आता अडचणीत आले आहेत.
येरळा नदीत पाणी नसल्याने काठावरील द्राक्षबागांना पाणी कमी पडू लागले आहे. छाटण्यानंतर पाण्याची आवश्यकता असते. मात्र ऐन उन्हाळ्यात पाणी कमी पडू लागल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. येरळ्यात तातडीने पाणी सोडावे अन्यथा आंदोलनाचा इशारा आता शेतकरी देऊ लागले आहेत.