पुणे ः खरीप हंगामासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख २७ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा खरीप हंगामासाठी सुमारे १० लाख ५७ हजार ७१९ हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. मागील तीन वर्षांत बियाण्यांची कमी-अधिक प्रमाणात विक्री झाली आहे. २०१५ मध्ये ६६ हजार ५५३ क्विंटल, २०१६ मध्ये एक लाख ५ हजार ३८८ क्विंटल, २०१७ मध्ये ९७ हजार २९ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी ८९ हजार ६५६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती.
यंदा चांगल्या पावसामुळे खरीप पिकांचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज गृहीत धरून कृषी विभागाने एक लाख २७ हजार ७९९ क्विटंल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यामध्ये खासगी कंपन्यांकडून ६० हजार २३, सार्वजनिक क्षेत्रातून ६७ हजार ७७६ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा अपेक्षित आहे. यात महाबीजकडून ६१ हजार २०६ क्विंटल बियाणे पुरवठा अपेक्षित आहे.
यंदा खरीप हंगामासाठी मागणी केलेल्या बियाण्यांमध्ये खरीप ज्वारी, संकरित बाजरी, सुधारित बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भूईमूग, तीळ, सूर्यफूल, सोयाबीन,कापूस, वाटाणा, धैंचा, ताग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे.
विभागात सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभागाने ६० हजार २८२ क्विंटल सोयाबीन बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. यात नगर जिल्ह्यातून बियाण्यांची मागणी अधिक आहे.
नगर जिल्ह्यातून सुमारे ४१ हजार ६४५ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे, तर सोलापूर जिल्ह्यातून १३ हजार १२५, पुणे जिल्ह्यातून पाच हजार ५१२ क्विटंल सोयाबीन बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.
पीकनिहाय बियाण्यांची मागणी (क्विटंल) : खरीप ज्वारी १३२, संकरित बाजरी १८३७, सुधारित बाजरी ४४४९, भात १६१७५, मका १३६८५, तूर ६०७४, मूग २८९८, उडीद १०५६२, भुईमूग ५२१५, तीळ ८, सूर्यफूल ८६१, सोयाबीन ६०,२८२, कापूस २१२५, वाटाणा १२९६, धैंचा ११००, ताग ११००.
जिल्हानिहाय बियाण्यांची मागणी (क्विटंल) जिल्हा | सरासरी क्षेत्र | एकूण मागणी |
नगर | ५,२१,१९५ | ६८,४५२ |
पुणे | २,१०,८२४ | २६,६८७ |
सोलापूर | ३,२५,७०० | ३२,६६० |
एकूण | १०,५७,७१९ | १,२७,७९९ |