ऑपरेटर्सअभावी ग्रामपंचायतींमधील कामे रखडली
जळगाव : ऑनलाइन कामांच्या नोंदी करण्यासाठी संग्राम कक्षांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये नेमण्यात आलेले ऑपरेटर नियमित कामावर येत नसल्याने कामे रखडल्याच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यात सुमारे आठशे ऑपरेटर असून, ग्रामपंचायतींच्या अहवालानंतर त्याची फेरचौकशी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येणार असल्याचे स्थायी समितीच्या सभेत ठरविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ३०) स्थायी समितीची सभा झाली. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, रजनी चव्हाण, सदस्य कैलास सरोदे, मधुकर पाटील, ज्योती पाटील, शशिकांत साळुंखे, सरोजिनी गरुड, मनोहर गिरधर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. एस. अकलाडे आदी उपस्थित होते.
ऑपरेटर्सच्या कामाविषयीच्या चौकशीचा ग्रामपंचायतींचा अहवाल आल्यानंतर त्याची ‘क्रॉस चेकिंग'' करण्याचे निश्चित करण्यात आले. शिवाय, चौदाव्या वित्त आयोगांतर्गत निधी व्यवस्थित खर्च होत नाही. या कारणावरून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी. ए. बोटेंना सभापती भोळे यांनी धारेवर धरले. चौकशीसाठी समिती जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या दहा टक्क्यांवरील ‘बिलो'' कामे घेतली जातात. या कामांच्या निरीक्षणांतर्गत त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे दहा टक्क्यांच्या वरील बिलो कामांचीदेखील चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी अध्यक्षा व उपाध्यक्षांच्या नियंत्रणाखाली समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये त्या-त्या गटातील जिल्हा परिषद सदस्याला सोबत घेऊन कामांची तपासणी करण्याचा ठराव सभेत करण्यात आला. पाणी टंचाई परिस्थिती पाहून एक महिन्याची मुदतवाढ देण्यासंदर्भातील ठराव करून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे पाठविण्याचे निश्चित करण्यात आले.