परभणी : जिल्ह्यातील अवर्षण प्रवण गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील पाणीटंचाईचे संकट दिवसागणिक गहिरे होत आहे. ढवळकेवाडी तांडा येथे गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाई उद्भवलेली आहे. अधिग्रहण करण्यात आलेल्या एकमेव बोअरचा तांड्यावरील कुटुंबांना पाण्यासाठी आधार आहे. पाणी कमी झाल्यामुळे महिलांना शेतातील तसेच घरची कामे सोडून घागरभर पाण्यासाठी बोअरच्या ठिकाणी दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ केलेल्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. पाण्यासाठी ग्रामस्थांची रानोमाळ भटकंती सुरू आहे.
सप्टेंबर महिन्यातच पाऊस उघडल्याने गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक लोकवस्त्यावरील ग्रामस्थांना गेल्या सहा महिन्यांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या दोन महिन्यांत तापमानात मोठी वाढ झाली आहे. सतत उपसा सुरू असल्यामुळे विहिरी, बोअरच्या पाण्याने गाठला आहे. ढवळकेवाडी तांड्याची लोकसंख्या सुमारे दीड हजार आहे. दुष्काळामुळे शेतातील कामे नसल्यामुळे अनेक ग्रामस्थांनी स्थलांतर केले. तांड्यावर वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांचे दिवाळी सणापासून पाण्यासाठी हाल होत आहेत.
पाणीटंचाई उपाययोजनाअंतर्गत तांड्याजवळील एका शेतातील अधिग्रहण करण्यात आलेला बोअरवरील पंप वीजपुरवठा खंडित झाल्यावर बंद राहतो. सध्या बोअरचे पाणी कमी झाले आहे.
दिवसभरात एका कुटुंबाला चार घागरी पाणी मिळणेदेखील मुश्किल झाले आहे, असे ज्येष्ठ नागरिक रतनबाई राठोड यांनी सांगितले. बोअरवरून घरचे पाणी भरुन परीक्षेचा अभ्यास करावा लागत आहे, असे महाविद्यालयीन विद्यार्थिनी उषा पवार हिने सांगितले. ढवळकेवाडी तांड्याशेजारील गोदावरी तांडा, मालेवाडी आदी ठिकाणीदेखील तीव्र पाणीटंचाई आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.