सांगली ः खरीप हंगामातील उडीद, मूग, मका, सोयाबीन पिकांची काढणी सुरू झाली आहे. परंतु शासनाने हमीभाव खरेदी केंद्र अद्यापही सुरू केलेली नाहीत. त्यामुळे खरेदी केंद्राद्वारे हमीभावाने विक्री करण्यासाठी नोंदणी सुरू केली नाही. ही नोंदणी आणि खरेदी केंद्र कधी होणार असा प्रश्न शेतकरी करू लागले आहेत.
जिल्ह्यात यंदा उन्हाळी चांगला पाऊस झाला. त्यानंतर मॉन्सून वेळेत दाखल झाला. त्यामुळे यंदा कडधान्याच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. यंदा खरीप हंगामातील पिकांना पोषक वातावरण असल्याने पिकांची अपेक्षित वाढ झाली असून अपेक्षित उत्पादनही शेतकऱ्यांच्या हाती लागत असल्याचे चित्र आहे. जत, कवठेमहांकाळ या तालुक्यासह अन्य भागातील खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे, तर अनेक ठिकाणी पिकांची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. शेतकरी कडधान्याची विक्री करण्यासाठी नियोजन करू लागला आहे. दरम्यान, आठवडा बाजार बंद असल्याने त्यांना मूग, उडीद पिकांची विक्री करणे मुश्कील बनले आहे.
शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी, नाफेडतर्फे खरेदी केंद्र सुरू केली जातात. मात्र, सप्टेंबर महिना उजाडला तरी खरेदी केंद्र सुरुझाली नाही. मुळात कडधान्ये ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस काढणी पूर्ण होते. सप्टेंबरचा दुसरा महिना आला तरी, खरेदी केंद्र सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. अजूनही हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी सुरू झालेली नाही. त्यामुळे ही नोंदणी कधी सुरू होणार असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
नोंदणी सुरू झाल्यानंतर पुन्हा खरेदी सुरू होणार अर्थात, या सगळ्या प्रक्रियेसाठी अजून एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही खरेदी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.