नांदेड : ढगाळ वातावरणामुळे नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील गहू पिकांवर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. तापमानातील चढ -उतारांमुळे वाढीसाठी पोषक वातावरण नाही. त्यामुळे अनेक भागांत गव्हाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. काही भागांत गव्हाच्या ओंब्याची अकाली निसवण होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे गव्हाच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या खंडानंतर या तीन जिल्ह्यांत यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. या तीन जिल्ह्यांत गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १३ हजार ४८४ हेक्टर आहे. यंदा डिसेंबर अखेरपर्यंत ९३ हजार ४३२ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात नांदेड जिल्ह्यातील २४ हजार ६६७ हेक्टर, परभणीतील ३२ हजार २०८ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील ३६ हजार ५५७ हेक्टरवरील गव्हाचा समावेश आहे. पावसामुळे तण वाढले. जमीन तयार करण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे यंदा गव्हाच्या पेरणीस उशीर झाला.
ओंब्याची लवकर निसवण
ढगाळ वातावरण, तापमानातील चढ-उतार, थंडीचे कमी प्रमाण आदी कारणांमुळे अनेक भागांत गव्हाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. ओंब्याची निसवण लवकर होत आहे. काही वाणांच्या पिकांवर तांबेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यंदा गव्हाचे पेरणीक्षेत्र वाढले असले, तरी उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.