पुणे : यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत पुणे विभागातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला. त्यामुळे टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. सध्या ३२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
यंदा विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या गावे व वाड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरच्या संख्येत मोठी घट झाली आहे. विभागात जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेबर या कालावधीत चांगला पाऊस झाला. काही काळ पावसाचा खंड पडल्याचे चित्र होते;
परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पावसाने जून, जुलैमधील पावसाची तूट भरून काढल्याने नद्या, नाले, ओढे भरून वाहत होते. परिणामी भूजल पातळीही वाढण्यास मदत झाली. सध्या काही भागांत विहिरी भरल्या असल्या तरी पुणे जिल्ह्यातील पुरंदर, साताऱ्यातील माण, खटाव, सांगलीतील जत, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्यात कमी पावसामुळे विहिरींमधील पाणीपातळी अजूनही कमीच आहे. त्यामुळे या भागात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
सध्या विभागातील एकूण ४७ गावे १७४ वाड्यांना ३२ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठ्यासाठी ५३ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील ३६ गावे व १०८ वाड्यांना २५ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. साताऱ्यातील दहा गावे, ५५ वाड्यांना सहा टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून पंधरा विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील एक गाव व ११ वाड्यांना एका टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील टॅंकर बंद झाले आहेत.
तालुकानिहाय टॅंकरची संख्या ः पुणे ः पुरंदर १, सातारा ः माण ४, खटाव २, सांगली ः जत १, खानापूर ५, तासगाव ४, कवठे महांकाळ १३, आटपाडी २.