जळगाव जिल्ह्यातील ३७ गावांत पाणीटंचाई
जळगाव : निम्मा पावसाळा अधिकृतपणे संपला आहे. तरीही जिल्ह्यात पाणीटंचाई कायम आहे. जोरदार पाऊस नसल्याने अनेक गावांमधील पाणीचटंचाई कायम असल्याने सध्या ३७ गावांमध्ये ३३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाचा दोन आठवड्यांपासून खंड पडल्याने गावांमधील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी, कूपनलिका यांच्या जलसाठ्यावरही परिणाम होत आहे. उपसा रोज केला जातो. पुनर्भरण जवळपास बंदच आहे. फक्त जूनमध्ये काही भागांत जोरदार पाऊस झाला. नंतर भीज पाऊस झाला. शेतांमधून पाऊस वाहून निघाला नाही. परिणामी, पाणीटंचाईही कायम आहे.
यंदा ९८ गावांमध्ये ९८ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. अनेक ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये झालेला जलसंचयही कमी होत आहे. यंदा ८८९ गावे टंचाई आराखड्यात समाविष्ट करण्यात आली होती. २९ कोटी ५० लाख निधी त्यासाठी मंजूर आहे.
अमळनेर व जामनेर तालुक्यांत टंचाईस्थिती अधिक आहे. जामनेर तालुक्यात २२ आणि मुक्ताईनगर तालुक्यात २० विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्ह्यात जुलैअखेरपर्यंत सरासरीच्या ३८ टक्केच पाऊस झाला आहे. पंचायत समित्यांकडून पाणीटंचाईसंबंधीच्या कार्यक्रमाची मागणी येऊ लागली आहे. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने टंचाई आराखड्यात आणखी मुदतवाढ दिल्याची माहिती मिळाली.