परभणी : वाढते तापमान, बाष्पीभवन, उपसा आदी कारणांमुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांनी तळ गाठला आहे. अनेक तलाव कोरडे आहेत. विहिरी, बोअरची पाणीपातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे अनेक गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावरील ग्रामस्थांना पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. दिवसागणिक पाणीटंचाईची दाहकता वाढत चालली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २६ पर्यंत वाढली आहे.
रविवारी (ता. ६) पैठण येथील जायकवाडी प्रकल्पात ३७.६९ टक्के, माजलगाव प्रकल्पात १८.९१ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ३५.७८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. आठवडाभरामध्ये या तीन धरणांतील पाणीसाठ्यात अनुक्रमे ३.०८, २.३१, २ टक्क्यांनी घट झाली आहे. पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर या दोन्ही धरणांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. या धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठ शिल्लक राहिला आहे.
करपरा मध्यम प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्यात आठवडाभरात ३ टक्के घट झाली असून, रविवारी या धरणामध्ये १६ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मासोळी धरणामध्ये आता केवळ मृत पाणीसाठा असून, त्यामध्येही घट होत आहे. धरणांवर अवलंबून असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.
२२ लघु तलावांपैकी टाकळवाडी, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगाव, दहेगाव हे सहा तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी, तांदूळवाडी, राणी सावरगाव, कोद्री, देवगाव, वडाळी, चारठाणा, केहाळ, भोसी या नऊ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेलेला आहे.
उर्वरित तलांवापैकी झरी (ता. पाथरी) येथील तलावांमध्ये जायकवाडी डाव्या कालव्याचे पाणी सोडण्यात आल्यामुळे पाणीसाठ्यामध्ये ९७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. पेडगाव तलावात ४, आंबेगाव तलावात २, पिंपळदरीत ७, कवडामध्ये ९, मांडवी मध्ये ३, पाडाळीमध्ये ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. विहिरी, बोअर आटत चालले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होत नाही. परिणामी, टॅंकरची संख्या वाढत चालली आहे.