औरंगाबाद : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत पाणीटंचाई भासत आहे. ३२१ गावे व ५३ वाड्यांना ३९६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी ८६३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील २४५ गावे व २९ वाड्यांना एप्रिलच्या मध्यान्हात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावे, वाड्यांना पाणी पुरविण्यासाठी ३०० टॅंकरची सोय करण्यात आली असून, जिल्ह्यातील २८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गंगापूर तालुक्यात सर्वाधिक ८४ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यापाठोपाठ फुलंब्री तालुक्यातील ३७, सिल्लोडमधील ३५, वैजापूरमधील २९, खुल्ताबादमधील २३, कन्नडमधील १७, पैठण तालुक्यातील एका गाव - वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
जालना जिल्ह्यातील ३५ गावे व ४ वाड्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गावांना ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परभणी जिल्ह्यातील १७ गाव-वाड्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या गावांची तहान भागविण्यासाठी दहा टॅंकर सुरू करण्यात आले आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दोन गावे व एका वाडीला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. येथे दोन टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील २१ गावे व १८ वाड्या मिळून ३९ ठिकाणी पाणीटंचाई भेडसावत आहे. येथे ३६ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. बीड जिल्ह्यातील दोन गावांमध्ये पाणीटंचाई भासत असून, प्रशासनाच्या वतीने पाणीपुरवठ्यासाठी तीन टॅंकरची सोय करण्यात आली आहे.
पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आलेल्या विहिरींच्या संख्येत २२० विहिरींची पडेली भर पाणीटंचाईची तीव्रता स्पष्ट करण्यास पुरेशी आहे. गत आठवड्यात ६४३ विहिरींच्या अधिग्रहणातून टॅंकरसाठी व टॅंकरव्यतिरिक्त पाणी पुरविले जात होते. या आठवड्यात ही संख्या ८६३ वर पोहचली आहे.
यामध्ये टॅंकरसाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची संख्या २१७ तर टॅंकरव्यतिरिक्त पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींची संख्या ६४६ इतकी आहे.