नगर ः जिल्ह्यात सध्या गेल्या सतरा वर्षांत पहिल्यांदाच पाणीटंचाईची तीव्रता कमी आहे. गतवर्षी या काळात सुमारे ११४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू होता. सध्या फक्त संगमनेर तालुक्यात दोन दिवसांपासून चार टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
ऊस आणि साखर कारखान्यांचा तसेच बागायती जिल्हा अशी ओळख असलेल्या नगरमध्ये अलीकडच्या पंधरा वर्षांत ही ओळख पुसू लागली होती. उत्तरेकडील मुळा, भंडारदरा, निळवंडे या धरणांच्या पाणलोटाचा लाभ असलेल्या काही तालुक्यांचा अपवाद वगळला तर जवळपास आठ तालुक्यात टंचाई निर्माण होत आहे.
गेल्या दहा वर्षांत तर परिस्थिती वरचेवर गंभीर होत आहे. पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, संगमनेर, कर्जत तालुक्यांसह इतर तालुक्यातही पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला. गेल्या सतरा वर्षांचा विचार करता टॅंकरची संख्या सातत्याने वाढत गेली होती. मात्र, गेल्या सात वर्षांपासून तर चक्क डिसेंबरमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा टॅंकरद्वारे करावा लागत होता. २००२ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या १३१ होती, तर २०१६ मध्ये तब्बल ८२८ टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला होता.
हा जिल्ह्यातील टॅंकर संख्येचा विक्रम मानला जातो. जिल्ह्यातील पारनेर, जामखेड, नगर, संगमनेर, पाथर्डीसारख्या दुष्काळी तालुक्यांत तर वर्षातील पावसाळ्याचे महिने वगळता टॅंकर सुरू असायचे. यंदा मात्र आतापर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासली नाही.
दोन दिवसांपूर्वी संगमनेर तालुक्यातील वरवंडी, वनकुटे आणि कर्जुले पठार, पानोडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जिल्हाधिकारी महाजन यांनी टॅंकर मागणी प्रस्तावाला मान्यता दिल्याने पहिल्यांदाच चार टॅंकर सुरू झाले. मात्र गेल्या सतरा वर्षांचा विचार करता जिल्ह्यामध्ये अजून तरी टंचाई नाही.
नगर जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून ‘जलयुक्त’ची कामे जोरात सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यातील ५४३ गावांत झालेली ‘जलयुक्त’ची कामे व २०१७ मध्ये झालेला १६५ टक्के पाऊस याचा एकत्रित परिणाम म्हणून भूजलपातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार व वृक्ष लागवडीच्या मोहिमांनी ही परिस्थिती झपाट्याने बदलली आहे.
त्यामुळे यंदा पहिल्यांदाच कडाक्याच्या उन्हाळ्यातही पाणीटंचाई निर्माण झाली नसल्याचा असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. १८ सप्टेंबर २०१७ पर्यंत संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यानंतर टॅंकर पूर्णतः बंद झाले.