सातारा : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत मागील १५ दिवसांत दमदार पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई कमी झाली आहे. जिल्ह्यातील माण, खटाव या दोन तालुक्यांत १० गावे व ५५ वाड्या वस्त्यांवर सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फलटण व कोरेगाव तालुक्यातील पाणीटंचाई दूर झाल्यामुळे प्रशासनाकडून टॅंकर बंद करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात झालेला पाऊस शेती, धरणातील पाणीसाठा व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरला आहे. पावसामुळे खरीप हंगामातील भात, सोयाबीन, ऊस, बाजरी, ज्वारी, भुईमूग आदी पिके भरण्यास मदत झाली आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने अनेक धरणातून विसर्ग करावा लागला होता. सध्या सर्व धरणांत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला असल्याने भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.
जिल्ह्यातील पूर्व भागात कमी पाऊस झाल्यामुळे १६ सप्टेंबरपर्यंत ६३ गावे व २७० वाड्या वस्त्यांवरील एक लाख २२९ नागरिकांना ४५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यानंतर दुष्काळी तालुक्यासह सर्वच भागांत दमदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या १८ दिवसांत सरासरी ११८.६ मिमी पाऊस झाला आहे. या पावसामुळे पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यातील ५३ गावांतील व २१५ वाड्या वस्त्यांवरील पाणीटंचाई दूर झाल्याने प्रशासनाकडून या गावातील टॅंकर बंद करण्यात आले. सध्या जिल्ह्यात माण, खटाव या दोन तालुक्यांतील दहा गावे व ५५ वाड्या वस्त्यांवरील १० हजार ६९९ लोकसंख्येस सहा टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पावसामुळे १६ सप्टेंबरच्या तुलनेत टॅंकरच्या संख्येत ३९ ने घट झाली आहे. फलटण व कोरेगाव या दुष्काळी तालुक्यातील टंचाई दूर झाल्याने या तालुक्यात टॅंकर बंद करण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काढणीला आलेली खरीप पिके अडचणीत आली आहेत. मात्र रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केली आहे.