पालखेडच्या धरणातून आवर्तन सुटले
नाशिक : येवला, मनमाडसह पाणीपुरवठा योजनांसाठी पालखेड धरणातून आवर्तन पाटबंधारे खात्यातर्फे सोडण्यात आले आहे. निफाड, येवला तालुक्यांत पावसाने दिलेली ओढ आणि दुबार पेरणीचे संकट लक्षात घेता कालव्यावाटे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होण्याची भीती अधिकाऱ्यांमध्ये आहे. चोरी थांबवण्यासाठी कालव्यातील डोंगळे काढणे, पोलिसांची गस्त ठेवण्यासाठी अधिकारऱ्यांनी धावाधाव सुरू केली आहे.
पालखेडमधून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडताना वेळोवेळी पाटबंधारे, जिल्हा प्रशासन व पोलिस खात्याकडून खबरदारी घेण्यात आली आहे. दिंडोरी तालुक्यातून सुटणारे पाणी वाटेत नाशिक, निफाड या तालुक्यांतून पुढे येवला व नंतर मनमाडपर्यंत जाते. वाटेत पाण्याची चोरी केली जात असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. कालव्यात जमिनीखाली डोंगळे टाकून तसेच पाइपलाइनच्या माध्यमातून चार ते पाच किलोमीटरपर्यंत पंपाच्या साह्याने पाणी नेले जाते. त्यामुळे पाणी सोडतेवेळी कालव्याच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करणे, पाणीचोरी रोखण्यासाठी पोलिसांची गस्त ठेवणे, डोंगळे जेसीबीच्या साह्याने उद्ध्वस्त करणे आदी उपाययोजना केल्या जातात. परंतु १ आॅगस्ट रोजी पालखेड धरणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यापूर्वी पाटबंधारे, महसूल व पोलिस खात्याने कोणतीही उपाययोजना केली नाही.
गेल्या आठवड्यात येवला, मनमाड शहर, रेल्वे, पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले असून, दोन दिवसांत सदरचे पाणी सुमारे ५० किलो मीटरपर्यंत पोचल्यानंतर पाटबंधारे खात्याला उपाययोजनांची आठवण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी सिन्नर, निफाड, नांदगाव या तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरविली आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली. मात्र, आता पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. पिके जगविण्यासाठी पाण्याची नितांत निकड भासू लागली असून, त्यामुळे पालखेडमधून सोडण्यात आलेले पाणी वाटेत चोरी होण्याची भीती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना आहे.