सोलापूर : जिल्ह्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (ता. २१) पहाटे चारच्या सुमारास पुन्हा सुरवात केली; पण त्यात जोर नव्हता. दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा सुरवात केल्याने उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढविण्यात आला आहे, पण धरणातील पाणीपातळी सध्या स्थिर आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा सुरवात केली आहे. गेल्या दोन दिवसांत अधून-मधून तो हजेरीही लावतो आहे. पण हवा तसा जोर नाही. गुरुवारी दिवसभर कधी ढगाळ वातावरण होते. तर कधी हलक्या धारा बरसत होत्या. त्यामुळे सूर्यदर्शन उशिरा झाले.
सोलापूर जिल्ह्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पण तसा पाऊस काही पडत नाही. मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट भागांत पावसाचे प्रमाण होते. अन्य तालुक्यांत मात्र पाऊस नव्हता. जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत सरासरी ११.१८ मिलिमीटर इतका पाऊस झाला.
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत ३७८.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पण तो सरसकट सगळीकडे नाही.
भीमेसह वीजनिर्मिती अाणि
कालव्याला पाणी सोडले
पुणे जिल्ह्यातही उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडतो आहे. त्यामुळे उजनी धरणाकडे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणामध्ये जवळपास ६५ हजार ९६९ क्युसेक इतके पाणी सोडले जाते आहे.
पण धरणातील पाणीपातळी वाढून पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी पुढे १३ हजार ७०० क्युसेक इतके पाणी भीमेसह वीजनिर्मिती व कालव्याला सोडले आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी सध्या स्थिर आहे.
गुरुवारी दुपारी धरणातील एकूण पाणीपातळी ४९७.१०० मीटर होती. तर त्यापैकी एकूण साठा ३४११.५९ दक्षलक्ष घनमीटर (१२०.४७ टीएमसी), तर उपयुक्तसाठा १६०८.७८ दक्षलक्ष घनमीटर (५६.८१ टीएमसी) आणि पाण्याची टक्केवारी १०६.४ टक्के इतकी होती.