लेंगरे, जि. सांगली : यंदाच्या गळीत हंगामातील उसाच्या तोडीसाठी विराज केन ॲग्रो सज्ज झाला असून कारखान्याची या हंगामातील पहिली टोळी देविखिंडीत दाखल झाली आहे. ऊसतोडीस प्रारंभ केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विराजने यंदाचा गाळप हंगाम इतर कारखान्यापेक्षा अगोदर सुरू केल्यामुळे उसाला तोड मिळू लागल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. चालू वर्षातील गळीत पूर्ण क्षमतेने करणार असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक वैभव पाटील यांनी सांगितले होते.
कोरोना महामारीच्या काळात ऊस वेळेत तुटेल की अशी शाश्वती नसताना विराजने ऊसतोडीस सुरुवात केल्याने शेतकरी आनंदीत आहे. विराज केन्सच्या चालू वर्षातील गळीत हंगामाची दिमाखात सुरुवात झाली आहे. या गळीत हंगामात विराज केन्स हे युनिट पूर्ण क्षमतेने चालवणार असून या हंगामात १.२५ लाख मेट्रिक टन एवढे गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याकडून ठेवण्यात आले आहे. यासाठी लागणारी सर्व ऊस तोड यंत्रणा सज्ज ठेवल्याने ऊसतोडीस वेळेत प्रारंभ झाला आहे. तरी परिसरातील शेतकरी व सभासद यांनी आपला ऊस हा कारखान्याला देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
त्याचबरोबर उसाला रास्त भाव व करेक्ट वजन देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कोरोनाच्या आपत्ती काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार दिल्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न निकाली निघत असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. देविखिंडी येथे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आदर्श बचत गटांची स्थापना केली आहे.
या गटातील शेतकऱ्यांनी कारखान्याकडे टोळीची मागणी केली होती. त्यानुसार ऊसतोड कामगार आल्यानंतर तात्काळ टोळी देत गटातील शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू करण्यात आली. ऊस लागणीनुसार ऊस तोडीला प्राधान्य देऊन क्रमाक्रमाने ऊस तोड केली जाणार असल्याचे गटाचे अध्यक्ष महादेव शिंदे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.