जळगाव : राज्य शासनाने जारी केलेल्या झिरो पेंडन्सी डेली डिस्पोजल या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा परिषदेत अगदी ४८ वर्षे जुन्या फायली, त्यांचे गाठोडे नोंदणीसाठी रेकॉर्ड रूममधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यावरील धूळ झटकून त्याची नोंदणी सुरू झाली आहे. अनावश्यक फायली, गाठोडे नष्ट केले जात असून, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील प्रमुख १२ विभागांसह सर्व पंचायत समित्यांच्या स्तरावर ही कार्यवाही सुरू आहे.
या कामासाठी संबंधित विभागांमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या २३ ते २५ डिसेंबर यादरम्यानच्या सुट्या रद्द केल्या आहेत. जिल्हा परिषदेत फक्त दोनच विभागांमध्ये झिरो पेंडन्सीसंबंधी कार्यवाही सुरू होती. इतर विभागात प्रतिसाद नव्हता. त्यासंबंधी नुकतीच नाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त (प्रशासन) सुखदेव बनकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर कामाला गती देण्यात आली.
सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी तीन दिवसांच्या सुट्या रद्द केल्या. कामकाज दोन दिवसांपासून गतीने सुरू असून, कर्मचारी अक्षरशः मास्क लावून सायंकाळपर्यंत काम करीत आहेत. वित्त, कृषी, समाज कल्याण, पशुसंवर्धन आदी विभागांची रेकॉर्ड रूम जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीत आहे. ती उघडून आपापल्या जुन्या रेकॉर्डची तपासणी सुरू झाली आहे. जुन्या रेकॉर्डची नोंदणी केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
तसेच कोंबडी बाजार भागातील रेकॉर्ड रूमही खुली झाली आहे. तेथे सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, बाल कल्याण, आरोग्य आदी विभागांची रेकॉर्ड रूम आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील अल्प बचत भवनावरील रेकॉर्ड रूममधूनही गाठोडे बाहेर काढण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.
त्यात हिरवे, लाल व पांढऱ्या रंगाचे गाठोडे तयार केले जात आहे. पांढऱ्या रंगातील गाठोडे अनावश्यक कागदपत्र म्हणून संगणकात नोंदवून ठेवले जात आहे. तर लाल व हिरव्या गाठोड्यात अतिमहत्त्वाचे आणि नियमित कामकाजाचे कागदपत्र आहेत. जी अनावश्यक कागदपत्र आहेत त्यांची रद्दी म्हणून विक्री करून संबंधित महसूल जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे निर्देश असून, त्याची जबाबदारी संबंधित विभागप्रमुखाकडे आहे. त्यासंबंधीच्या पावत्या जतन
करायच्या आहेत.