सोलापूर : राज्य पणन विभागाने तूर खरेदीसाठी यंदाही जिल्ह्यात आठ ठिकाणी खरेदी केंद्रे उघडली आहेत. या केंद्रांमार्फत तुरीची सध्या खरेदीही सुरू आहे; पण या खरेदी केंद्रांना अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आतापर्यंत तूर खरेदीसाठी ९४११ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी फक्त १९०६ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. त्यावरून शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात येतो.
यंदा खरेदी व्यवस्थापनासाठी पणन विभागाने ‘अॅप’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना नावनोंदणी सक्तीची केली. नावनोंदणी करूनदेखील शेतकऱ्यांच्या तूर विक्रीचा प्रश्न सुटलेला नाही. सोलापूर जिल्ह्यात ४ फेब्रुवारीपासून तूर खरेदी केंद्राचा प्रारंभ झाला. सुरवातीला प्रतिहेक्टरी साडेपाच क्विंटल तुरीचा कोटा देण्यात आला होता. त्यामुळे शेतकऱ्यांची अडवणूक झाली. या कोट्यात नंतर साडेआठ क्विंटल व गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी आता दहा क्विंटलची मर्यादा देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांच्या विक्री कोट्यात वाढ झाल्याने तूर खरेदीचा वेग वाढेल, असा विश्वास पणन विभागाने व्यक्त केला आहे.
पण रखडलेले चित्र पाहता ही खरेदी वाढेल, अशी शक्यता कमीच आहे. यंदाच्या हंगामात तुरीला ५४५० रुपये क्विंटल हमीभाव निश्चित झाला आहे. पण आतापर्यंत खरेदी झालेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे यंदा पुन्हा तूर खरेदीचा हा विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे.
केंद्रनिहाय झालेली तूर खरेदी (क्विंटल) व कंसात शेतकऱ्यांची संख्या ः अक्कलकोट : १८११ (१३७), बार्शी : १९१४ (१८८), दुधनी : १६०० (१२१) , करमाळा : १९२७ (२०४) , कुर्डुवाडी : ६५६७ (७३७), माळकवठे : २४७६ (१९३), मंगळवेढा : १६३९ (१४३) , सोलापूर : २२३४ (१८३) .