लातूर : हमी दराने खरेदी केलेल्या ४१ हजार ९०० क्विंटल तुरीसह २२ हजार ४७ क्विंटल हरभरा साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच उपलब्ध नाही. त्यामुळे हा सर्व खरेदी केलेला शेतीमाल संबंधीत केंद्रांवर पडून आहे. जोवर गोदामांमध्ये शेतीमाल साठविला जात नाही, तोपर्यंत त्याचा मोबदला देण्याविषयीची हालचाल होत नसल्याने शेतकऱ्यांनाही शेतीमालाचे चुकारे मिळण्यास विलंब होत आहे.
लातूर जिल्ह्यात यंदा तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी दहा केंद्रे सुरू करण्यात आली. या दहाही केंद्रांच्या माध्यमातून २ मे अखेरपर्यंत १४ हजार ३८५ शेतकऱ्यांची १ लाख ५९ हजार १३२ क्विंटल २६ किलो तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली. या तुरीची खरेदी किंमत जवळपास ८६ कोटी ७२ लाख ७० हजार रुपयांच्या घरात जाते. खरेदी करण्यात आलेल्या तुरीपैकी १ लाख १७ हजार २३१ क्विंटल तुरीलाच साठविण्यासाठी आजवर गोदामात जागा मिळाली आहे. ४१ हजार ९०० क्विंटल तूर अजूनही गोदामांमध्ये साठविणे बाकी आहे. त्यामुळे चुकारे मिळण्याच्या अडचणी कायम आहेत.
दुसरीकडे हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी लातूर जिल्ह्यात १३ खरेदी केंद्र सुरू करण्यात आली. त्यापैकी जळकोट व निलंगा वगळता बारा केंद्रांवरून आजवर २२ हजार ९८४ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेल्या या हरभऱ्याला साठवणुकीसाठी गोदामांमध्ये जागाच न मिळाल्याने हरभऱ्याच्या विक्रीपोटी शेतकऱ्यांनाही मोबदला मिळणे बाकी आहे.
बाजारात दर पडल्याने शासनाने हस्तक्षेप करून हमी दराने तूर व हरभरा खरेदी सुरू केली. तूर खरेदीला मुदतवाढ देण्यात आली तर हरभरा खरेदीची गती संथच आहे. तुरीच्या खरेदीला येण्यासाठीचा एसएमएस मिळण्यातही अडचणी असल्याचा प्रकार शेतकऱ्यांनी समोर आणला होता. त्यामुळे तुरीच्या हमी दराने खरेदीत जशा अडचणी आल्या त्या हरभऱ्याच्या खरेदीत तर येणार नाहीत ना, असा प्रश्न हरभरा उत्पादकांना पडला आहे.