पुणे : ग्राहकांना उच्च दर्जाचा शेतीमाल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करण्यासाठी आत्माअंतर्गत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तब्बल ३३० टन शेतीमालाची विक्री केली असून यातून दोन कोटी १६ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.
सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते पाटील जन्म शताब्दी वर्षानिमित्त सिंचननगर येथील अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राऊंडवर खास कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाला पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला मात्र दुसऱ्या दिवसापासून ग्राहकांनी येथे चांगली गर्दी केली होती.
सेंद्रिय धान्य महोत्सव विभागात एकूण ७२ स्टॉल होते. यात पुणे जिल्ह्यातील सेंद्रिय गटाबरोबरच कोल्हापूरपासून ते गडचिरोलीपर्यंतच्या सेंद्रिय गटांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूरचा आजरा घनसाळ ते गडचिरोलीचा गोफ्स हा ब्रॅंण्ड पुणेकरांच्या पसंतीस चांगलाच उतरला. पुणे जिल्ह्याच्या मावळ पट्ट्यातील सेंद्रिय इंद्रायणी, हातसडी तांदळास ग्राहकांकडून मोठी मागणी होती.
महोत्सवात सेंद्रिय ज्वारी, बाजरी, नाचणी या धान्यबरोबरच हरभरा, काळा वाटाणा अशी कडधान्येही विक्रीस उपलब्ध होती. याशिवाय विषमुक्त भाजीपाला तसेच फळांमध्ये अंजीर, पेरू, संत्रे, चिक्कू, कलिंगड, लिंबू, खरबूज ही फळे खास आकर्षक ठरले.
महोत्सवात सुमारे ३५ टन सेंद्रिय तांदळाची विक्री झाली असून त्यातून २९ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. वीस टन गुळाची विक्री झाली. त्यातून २६ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल झाली. गावरान तुपाची एक हजार ५९४ किलो विक्री झाली असून ३९ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे.