नाशिक : नाशिक विभागातील चार जिल्हे हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले आहे. जळगाव जिल्हा मात्र हागणदारीमुक्त होऊ न शकल्याने नाशिक विभाग संपूर्ण हागणदारीमुक्त होऊ शकला नाही. विभागातील जळगाव जिल्हा वगळता नाशिक, धुळे, नंदुरबार आणि नगर हे चार जिल्हे शंभर टक्के हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेंतर्गत २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. शासनाने या योजनेची गेल्या दोन वर्षांपासूनच अंमलबजावणी सुरू केली होती. २०१९ पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट असले तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र मार्च २०१८ पर्यंतच राज्य हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाला दिले होते. त्यानुसार प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते.
मार्च २०१८ अखेर विभागातील नाशिक जिल्ह्यातील १३६८, नगर जिल्ह्यातील १३११, धुळे जिल्ह्यातील ५४९, नंदुरबार जिल्ह्यातील ४९९, तर जळगाव जिल्ह्यातील १०१७ अशा एकूण ४८७५ पैकी ४७४४ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत.
विभागातून जळगाव या एकमेव जिल्ह्यातील १३१ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. जळगाव जिल्ह्यात अवघ्या ८८.५९ टक्के ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. विभागात हागणदारीमुक्त घोषित करण्यात आलेल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी २२११ ग्रामपंचायती मार्च २०१७ अखेर, तर २५३३ ग्रामपंचायती मार्च २०१८ अखेर हागणदारीमुक्त झालेल्या आहेत.
विभागात ५ लाख ९४ हजार ८८५ कुटुंबांना स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या योजनेमुळे वैयक्तिक शौचालय सुविधा मिळालेली आहे. मार्च २०१८ अखेर विभागात आता केवळ ८१९ कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालये उपलब्ध नाहीत. ही सर्व कुटुंबे जळगाव या एकाच जिल्ह्यातील आहेत.