नांदेड : नांदेड विभागातील पाच जिल्ह्यांतील २०१७-१८ च्या हंगामात गाळप सुरू केलेल्या ३२ पैकी ३१ साखर कारखान्यांचे गाळप हंगाम आटोपले आहेत. नांदेड जिल्ह्यातील एका साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे. रविवारपर्यंत (ता. ६) विभागातील सर्व ३२ साखर कारखान्यांनी १ कोटी १७ लाख ३२ हजार ३२८ टन ऊस गाळप केला. एकूण १ कोटी २५ लाख २ हजार ६७६ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. सरासरी साखर उतारा १०.६६ टक्के आला आहे.
परभणी जिल्ह्यातील सर्व ५ खासगी साखर कारखान्यांचे गाळप संपले आहे. या कारखान्यांनी यंदा एकूण १७ लाख ७४ हजार ५८०.५५ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.३१ टक्के उताऱ्याने १८ लाख ३० हजार १४१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.०८ टक्के आला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व ५ सहकारी साखर कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. या कारखान्यांनी यंदा एकूण ११ लाख २४ हजार ७५६ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.८४ टक्के उताऱ्याने १२ लाख १८ हजार ७७५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. भाऊराव चव्हाण युनिट-२ डोंगरकडा या कारखान्याचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक ११.५३ टक्के आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील ३ सहकारी आणि २ खासगी अशा एकूण ५ साखर कारखान्यांपैकी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे गाळप सुरू आहे. सर्व पाच कारखान्यांनी यंदा एकूण १३ लाख ८७ हजार ५८९ टन ऊस गाळप केला आहे. सरासरी १०.९३ टक्के साखर उताऱ्याने १५ लाख १६ हजार ५०१ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११.३० टक्के आला आहे.
लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी आणि ४ खासगी अशा एकूण ८ साखर कारखान्यांचे गाळप आटोपले आहे. या कारखान्यांनी यंदा एकूण ३५ लाख ६९ हजार ८८८ टन ऊस गाळप केले असून सरासरी ११.२४ टक्के उताऱ्याने एकूण ४० लाख १३ हजार ९८० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जागृती शुगर्स चा साखर उतारा सर्वाधिक ११.७९ टक्के आला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ सहकारी आणि ७ खासगी असे एकूण १० साखर कारखान्यांचे गाळप आटोपले आहेत. या कारखान्यांनी यंदा एकूण ३८ लाख ७५ हजार ५१४ टन ऊसाचे गाळप केले असून सरासरी १०.१२ टक्के उताऱ्याने एकूण ३९ लाख २३ हजार २७९ क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. नॅचरल शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१५ टक्के आला आहे.