कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. मार्च महिन्याच्या मध्याअखेर जिल्ह्यात १ कोटी ३० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुक्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम हळूहळू संपत आहे. २२ पैकी ११ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
अद्यापही जिल्ह्यातील शिवारांमध्ये पंधरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक आहे. करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील बहुतांशी साखर कारखान्यांचा हा ऊस आहे. यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे गाळप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून ऊन वाढत असल्याने त्याचा स्पष्ट परिणाम कारखान्यांच्या गळित हंगामावर दिसून येत आहे. अगोदरच पन्नास टक्के मनुष्यबळावर साखर कारखान्यांनी ऊसतोडणी सुरू केली आहे. यामुळे अपेक्षित वेळापत्रकापेक्षा दहा ते पंधरा दिवसांनी तोडणी पुढे जात आहे. याचा सर्व ताण कारखान्यांच्या तोडणी यंत्रणेवर येत आहे. परिणामी, कारखान्याच्या ऊस विकास विभागात नियोजनाबाबतही ताण येत असल्याचे कारखान्यांच्या ऊस विकास विभागातून सांगण्यात आले.
एका गावातून ऊसतोडणी यंत्रणा दुसऱ्या गावात नेईपर्यंत व्यवस्थापनाची दमछाक होत आहे. तोडणी आवरत नसल्याने मजुरांच्या क्रयशक्तीवरही परिणाम होत असल्याने ऊसतोडणी संथ गतीने होत आहे. अनेक मोठ्या कारखान्यांचा हंगाम पंधरा दिवस राहिला आहे; पण तो पूर्ण करेपर्यंत व्यवस्थापनाची मोठी धावपळ होत असल्याचे कारखान्यांच्या सूत्रांनी सांगितले.
गळीत हंगामात ऊन व मजूरटंचाईचा अडथळा निर्माण होत असला तरी यंदा शिवारात ऊस शिल्लक राहण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही कारखाने एप्रिलच्या मध्यापर्यंत चालू शकतील. पावसाचा अडथळा न आल्यास यंदाचा हंगाम एप्रिलच्या पहिल्या सप्ताहापर्यंत संपू शकेल, अशी शक्यता साखर कार्यालयाच्या सूत्रांनी व्यक्त केली.