औरंगाबाद : यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी असलेल्या मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांपैकी चार कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एक, जळगाव जिल्ह्यातील दोन व जालना जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांतील कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ४९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ६२ हजार ४८९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
यंदा आजवरच्या ऊस गाळप हंगामात औरंगाबाद, जालना, बीड व जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील तेवीस साखर कारखान्यांनी सहभाग नोंदविला. ऊस गाळप करणाऱ्या २३पैकी चार कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, जळगाव जिल्ह्यातील चोपडा व संत मुक्ताबाई अँड शुगर; तर जालना जिल्ह्यातील रामेश्वर साखर कारखान्याचा समावेश आहे. गाळपात सहभाग नोंदविलेल्या २३ साखर कारखान्यांनी ८१ लाख ४९ हजार ४६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यामधून ८० लाख ६२ हजार ४८९ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. सर्व कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.८९ टक्के राहिला.
गाळप हंगाम आटोपलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी साखर कारखान्यांचा साखर उतारा १०.१९ टक्के राहिला. या कारखान्याने १ लाख ३२ हजार ९८६ मेट्रिक टन ऊस गाळप केले. त्याद्वारे १ लाख ३५ हजार ४७५ क्विंटल साखर उत्पादन झाले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा साखर कारखान्याने ३४ हजार २८५ टन ऊस गाळपातून २८ हजार २७० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या कारखान्याचा साखर उतारा ८.२५ टक्के राहिला.
जळगावमधील संत मुक्ताबाई शुगर अँड एनर्जीने गाळप हंगामात १ लाख ३४ हजार ४६७ टन उसाचे गाळप करत १ लाख २५ हजार ४७० क्विंटल साखर उत्पादन घेतले. या कारखान्याचा साखर उतारा ९.३३ टक्के आहे. जालना जिल्ह्यातील रामेश्वर साखर कारखान्याने २ लाख २७ हजार ८७३ टन उसाचे गाळप करत २ लाख ८ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले.
नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड या चार जिल्ह्यांतील १० कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्क्यांपुढे राहिला आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.१९,अॅस्टोरिया साखर कारखान्याचा १०.०९, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड कारखाना बारामती अॅग्रोचा १०.०८, मुक्तेश्वर शुगर्सचा १०.५८, जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट एक १०.३२, श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा १०.७६, बीड जिल्ह्यातील ‘छत्रपती’चा १०.०४, जय महेश एनएसएल १०.०३, येडेश्वरी शुगर कारखान्याचा साखर उतारा १०.५२ टक्के राहिल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली.