सातारा ः जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास वेग आला असून, जिल्ह्यातील १४ कारखान्यांचे गाळप सुरळीत सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता. २५) या १४ कारखान्यांमधून एकूण २८ लाख ९१ हजार ६२४ मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. त्याद्वारे ३१ लाख १२ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. हंगामास दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी होऊनही काही कारखान्यांकडून पहिला हप्ता दिला गेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सह्याद्री कारखान्याने साखर उत्पादन व गाळपात आघाडी घेतली आहे.
जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांमध्ये पूर्ण क्षमतेने गाळप सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी एफआरपी व अधिक २०० रुपये हा ऊसदराचा कोल्हापूर पॅटर्न मान्य केला होता. या पॅटर्नपेक्षा काही कारखान्यांकडून जास्त दर दिला जात आहे. १४ कारखान्यांनी सोमवारपर्यंत २८ लाख ९१ हजार ६२४ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. त्याद्वारे ३१ लाख १२ हजार ३२० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
कारखान्यांच्या सरासरी उताऱ्यात सुधारणा होऊ लागली असून, जिल्ह्यात सरासरी साखर उतारा १०.७६ टक्के येत आहे. सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक चार लाख १३ हजार ८०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून चार लाख ८८ हजार ३१५ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सह्याद्री कारखान्याची साखर उताऱ्यात आघाडी असून, या कारखान्याचा ११.८० टक्के साखर उतारा आहे. साखर उताऱ्यात दुसरा क्रमांक जयवंत शुगरचा असून, या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११.५८ टक्के आहे; तसेच श्रीराम, कृष्णा कारखान्याचा सरासरी साखर उतारा ११ टक्क्यांवर येऊ लागला आहे. जिल्ह्यात अजिंक्यतारा, कृष्णा, जयवंत, ग्रीन पॉवर, श्रीराम व न्यू फलटण या कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे.
ऊस गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी सर्वच कारखान्यांची गाळपाची उद्दिष्टे ठरवून हंगामास सुरवात केली आहे. उद्दिष्ट गाठण्यासाठी मिळेल तेथून ऊस आणला जात असल्याने कार्यक्षेत्रातील सभासदांच्या ऊस गाळपास विलंब केला जात असल्याचे सभासदाकडून सांगितले जात आहे.
गेटकेन ऊस जास्त आणल्याने सरासरी उताराही कमी मिळत असल्याने पुढील हंगामाच्या दरावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मागील हंगामात कमी दर देणाऱ्या कारखान्यास ऊस देण्यास शेतकरी अनुत्सुक असल्याचे दिसत असल्याने उद्दिष्ट गाठताना या कारखान्यांना कसरत करावी लागणार आहे.