पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम नुकताच (ता. १४) संपला आहे. आता जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपल्याने पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामाच्या तयारीसाठी ऊस तोडणी कामगार आपल्या गावी जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.
जिल्ह्यात एक नोव्हेंबरपासून गाळप हंगामास सुरुवात झाली होती. यंदा सुमारे सहा ते साडे सहा महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. हंगामात१८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. गेल्या महिन्यात तीन एप्रिल रोजी सर्वप्रथम पराग अॅग्रो या साखर कारखान्याचा गाळप हंगाम आटोपला. त्यानंतर हळूहळू अन्य कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली. चौदा मे रोजी सर्वांत शेवटी माळेगाव कारखान्याचा गळीत हंगाम संपला.
सध्या कारखाने बंद झाल्यामुळे कारखाना कार्यस्थळावरील हॉटेल, दुकांनातील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे.
जिल्ह्यात ११ सहकारी साखर कारखाने, तर सहा खासगी साखर कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांनी दैनंदिन गाळपक्षमता ७६ हजार २५० मेट्रिक टन होती. जिल्ह्यात या सर्व कारखान्यांनी हंगामात ११५ लाख ४० हजार ८४६ टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून १३१ लाख ३२ हजार ४३० क्विटंल साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा सरासरी ११.३८ टक्के मिळाला आहे.
जिल्हयात सर्वाधिक गाळप बारामती अँग्रो या साखर कारखान्याने केले आहे. यंदा या कारखान्याने दहा लाख १९ हजार ६२५ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे. त्यातून ११ लाख ७१ हजार ४०० क्विटंल साखर उत्पादन झाले असून साखरउतारा सरासरी ११.४९ टक्के एवढा मिळाला आहे.