संकेश्वर, कर्नाटक ः बेळगाव जिल्ह्यातील काही कारखान्यांनी ऊसगाळप सुरू केले आहे. मात्र, उसाच्या टंचाईमुळे यंदाचा ऊस हंगाम येथील कारखान्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे दिसत आहे.
जिल्ह्यात एकूण २३ साखर कारखाने आहेत. या कारखान्यांना उसाच्या पळवापळवीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर उसाला जादा दर देणे अनिवार्य ठरणार आहे.
जिल्ह्यातील व्यंकटेश्वरा (बेडकीहाळ, ता. चिक्कोडी) व कृष्णा सहकारी (हल्याण, ता. अथणी) आदी कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या (२०१६-१७) गाळप हंगामात प्रतिटनास तीन हजार दर दिला होता. जिल्ह्यातील उर्वरित कारखान्यांनी प्रतिटन २५०० ते २७०० रुपये असा दर दिला होता. मात्र, ऊसटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदाचा हंगाम कारखान्यांसाठी अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.
घटप्रभा (ता. गोकाक) सहकारी कारखान्याने १ सप्टेंबरपासून ऊसगाळप सुरू केले आहे. उर्वरित कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करण्यासाठी तयारी केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील ऊसपिकाची पावसाअभावी वाढ खुंटलेली आहे. त्यात हुमणी कीड, पांढरा लोकरी मावा आणि तांबेरा प्रादुर्भावामुळे ऊसपीक धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस झाला आहे. हा पाऊस ऊसपिकासाठी पोषक असला तरीही ऊसटंचाईची समस्या दूर होणार नाही, अशी वस्तुस्थिती आहे.
कोल्हापूरप्रमाणे बेळगावात उसाला दर का नाही?
गोड जिल्हा म्हणून ख्याती असलेल्या बेळगाव जिल्ह्यात सात सहकारी आणि सोळा खासगी मिळून एकूण २३ कारखाने आहेत. यंदाच्या हंगामासाठी १.९५ लाख हेक्टरवर उसाची उपलब्धतता आहे. शेजारील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांप्रमाणे प्रतिटनास ३,००० ते ३,१५० रुपये दर देण्याचे अनुकरण बेळगाव जिल्ह्यात होणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
उसाच्या टंचाईमागे दुष्काळी परिस्थिती हे जरी प्रमुख कारण असले, तरी उसाला योग्य किफायतशीर दर देण्यास बेळगाव जिल्ह्यातील कारखाने पिछाडीवर असल्याचा सूर शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.