वऱ्हाडात पावसाचे जोरदार पुनरागमन
अकोला : दोन दिवस उसंत घेतल्यानंतर वऱ्हाडात पुन्हा पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळी आठ वाजेपर्यंत वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यांत सर्वदूर जोरदार पावसाची नोंद झाली आहे. प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक आहे.
१६ ते १८ ऑगस्टदरम्यान पाऊस झाल्यानंतर दोन दिवस पाऊस थोडा मंदावला होता. मात्र, सोमवारी (ता. २०) रात्रीपासून सर्वदूर पाऊस पुन्हा सक्रिय झाला. या पावसामुळे आता संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ४२०.६ मिलिमीटर पाऊस झाला असून सरासरी ३२.४ मिलीमिटर एवढी आहे. यात बुलडाणा तालुक्यात ४२.३, चिखली ३१.५, देऊळगावराजा २६.२, सिंदखेडराजा ३९, लोणार ४२.३, मेहकर ५०.४, खामगाव ११.५, शेगाव २२.४, मलकापूर २२.४, नांदुरा २१, मोताळा २७.४, संग्रामपूर २९.२, जळगाव जामोद येथे २९.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यातही सातही तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. अकोल्यात ४०.९, बार्शिटाकळी ३६.१, अकोट ३९.२, तेल्हारा ४३, बाळापूर २३.२, पातूर २६ आणि मूर्तिजापूरमध्ये २० मिलिमीटर असा एकूण २३७ मिली पाऊस पडला.
जिल्ह्यात सरासरी ३३.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. वाशीम तालुक्यात सर्वाधिक ५५.४६ मिली पाऊस नोंदवल्या गेला. मालेगाव ४२.४८, रिसोड ५०.५०, मंगरुळपीर २८.५७, मानोरा २५.६७, कारंजा ४०.५० असा पाऊस मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत नोंदवला गेला.