पुणे : उन्हाचा चटका वाढताच जिल्ह्यात पाणीटंचाई वाढू लागली आहे. यात आंबेगाव, पुरंदर, भोर तालुक्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यातील ७ गावे १७ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ८ टॅंकर सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. पावसाळा सुरू होण्यास आणखी माहिनाभाराचा कालावधी लागणार असल्याने पाणीटंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वांत प्रथम पुरंदर तालुक्यात टंचाईच्या झळा वाढल्या होत्या. त्यापाठोपाठ भोर आणि आंबेगाव तालुक्यातील गावांना पाणीटंचाई भासू लागली असून, जिल्ह्यातील सुमारे १० हजार लोकसंख्येची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत आहे. यात पुरंदर तालुक्यातील सोनोरी गाव आणि सात वाड्या, वस्त्या, दिवे गावठाण आणि पवारवाडी, काळेवाडी येथे पाणीटंचाई वाढली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पारगावतर्फे खेड गावठाण व पाच वस्त्या, माळीन गावठाण तर भोर तालुक्यातील भुतोंडे गावठाण, खुलशी धनगरवस्ती, म्हसर बु. हुंबेवस्ती, डेहन गावठाण आणि जळकेवाडी, शिरवली हिमा या गावांना आणि वाड्या वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली.
जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती तालुका | गावे | वाड्या | टॅंकर |
आंबेगाव | २ | ५ | ३ |
भोर | ४ | ३ | ३ |
पुरंदर | १ | ९ | २ |
एकूण | ७ | १७ | ८ |