तूरडाळ विक्रीसाठी सरकारची धावपळ
तूरडाळ विक्रीसाठी सरकारची धावपळ 
मुख्य बातम्या

तूरडाळ विक्रीसाठी सरकारची धावपळ

टीम अॅग्रोवन

मुंबई : गेल्या वर्षी खरेदी केलेली २५ लाख क्विंटल तूर विक्रीसाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. तुरीची संपत आलेली शेल्फ लाइफ आणि त्यामुळे होणारा संभाव्य तोटा नजरेसमोर ठेवून सरकारने तुरीची डाळ करून ७५ रुपये या आधीच्या दराऐवजी ५५ रुपये प्रतिकिलो या दरावर सर्व शासकीय आस्थापनांमध्ये वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाड्या, माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व शाळा, मोठी देवस्थाने, रेशन आणि कारागृहे यांना देण्यात येणार असून, त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे.  दै. अॅग्रोवनने तुरीची शेल्फ लाइफ संपत आल्याने राज्याच्या तिजोरीला आठशे ते हजार कोटींचा फटका सहन करावा लागणार असल्याचे वृत्त दिले होते. त्यानंतर जागे झालेल्या शासनाने यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या प्रश्नाचा आढावा घेऊन जलदगतीने तूर विक्रीचे निर्देश दिले आहेत.  राज्य सरकारने ७ मे २०१८ पर्यंत राज्यातील ३० लाख ३४८ शेतकऱ्यांकडून २८ लाख ८८ हजार ९१८ क्विंटल तूर खरेदी केली आहे. मागील वर्षातील २५ लाख क्विंटल तूर सरकारी गोदामात पडून आहे. त्यात नव्या तुरीची भर पडल्याने आताच हा साठा सुमारे ५० लाख क्विंटलपुढे गेला आहे. अजूनही कित्येक शेतकऱ्यांकडे यंदाची तूर शिल्लक असून सरकारने तूर खरेदीची तारीख १५ मेपर्यंत वाढविल्याने यात अजून वाढ होईल. आधीच्या साठ्याने गोदामे भरल्याने नव्याने खरेदी केलेल्या तुरीसाठी जागा मिळत नाही. गेल्या वर्षी आणि यावर्षी खरेदी केलेल्या या तुरीमुळे राज्य सरकारच्या नाकातोंडातून धूर निघायची वेळ आली असून राज्यात गोदामात पडून असलेल्या गेल्या खरिपातील सुमारे पंधराशे कोटी रुपयांच्या या तुरीचे करायचे काय असा प्रश्न सरकारला पडला आहे. विशेषतः या तुरीची शेल्फलाइफ संपत आल्याने कोणत्याही परिस्थितीत ही तूर विक्रीला काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. शेजारी तमिळनाडू सरकारनेही तूर खरेदीस नकार दिल्याने आता सरकारने राज्यातीलच सरकारी आस्थापनांसोबत नांदेड, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट, पंढरपूर येथील मोठ्या देवस्थानांच्या जेवणावळीसाठी तूर खरेदी केली जावी, असे निर्देश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  तसेच राज्यातील अंगणवाड्या आणि शाळांमध्येही तूर दिली जाणार आहे. अंगणवाड्यांमध्ये एकात्मिक बाल विकास विभागाकडून तूर वापरली जाते का याची तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी माध्यान्ह भोजन योजनेसाठी ८० रुपये प्रति किलो दराने तूर खरेदी केली जाते. याआधी पणन विभागाने ७५ रुपये किलो दराने शाळांना तूर देण्यास समर्थता दर्शवली होती. मात्र, कोणत्याही परिस्थितीत तूरडाळीची विक्री होऊन हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी दर कमी करून ५५ रुपये किलो दराने शाळांना दिली जाणार आहे. हाच दर इतर आस्थापनांनाही लागू होणार आहे. त्याबाबतचा निर्णय लवकरच मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत होईल, अशी माहिती पणन विभागातील सूत्रांनी दिली आहे.  राज्यातील अंगणवाड्यांना दोन महिन्यांसाठीचा तर जिल्हा परिषद शाळांना सहा महिन्यांचा पुरवठा करावा, असेही निर्देश पणन विभागाकडून देण्यात येणार आहेत. राज्याच्या विविध कारागृहांमध्ये १ मार्चपर्यंत २०१८ पर्यंत ३२ हजार ४५१ कैदी होते. या कैद्यांवर सरकार दरवर्षी ८४ कोटी ३७ लाख रुपये खर्च करते. त्यापैकी सुमारे ३७ कोटी रुपये जेवणावर खर्च होतो. त्यामुळे तूर बाजारातून खरेदी करण्याऐवजी सरकारकडून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. शिधावाटप दुकानावरही तूर उपलब्ध करून देण्यात येत असून ग्रामीण भागातील ग्राहकांचे तूर खाण्याचे प्रमाण लक्षात घेता सुरवातीला ५० टक्के रक्कम घेवून तूर दुकानदारांना देण्यात येणार आहे. काही दिवसांच्या मुदतीनंतर उर्वरित रक्कम घेतली जाणार आहे.   १२ लाख क्विंटल डाळ विकली जाण्याचा अंदाज गेल्या वर्षीच्या शिल्लक २२ लाख क्विंटल तुरीची डाळ बनवल्यास त्यातून १६ ते १७ लाख डाळ बनणार आहे. वरीलप्रमाणे सर्व सरकारी आस्थापनांना तूरडाळ वितरीत केल्यास सुमारे १२ लाख क्विंटल इतकी डाळ विकली जाईल असा अंदाज आहे. ही तूरडाळ विकली गेल्यास सरकारला मोठा दिलासा मिळणार असला तरी या सगळ्यात चांगलाच आर्थिक फटकाही सहन करावा लागणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT