सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील २०१५-१६ मध्ये ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असणाऱ्या गावांमधील बाधित शेतकऱ्यांना शासनाने अनुदान दिले आहे. तालुक्यातील २६ हजार ७३६ शेतकऱ्यांकरीता पाच कोटी ३६ लाख ५६ हजार ८९६ इतके अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी १० हजार ८४० शेतकऱ्यांच्या खाते क्रमांकाची माहिती उपलब्ध झाल्याने त्यांच्या बॅंक खात्यात एक कोटी ७५ लाख ५४ हजार ४३३ इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित १५ हजार ८९६ खातेदारांनी खाते नंबर न दिल्याने ही रक्कम पडून आहे. दरम्यान, जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतही काहीशी अशीच परिस्थिती आहे.
दुष्काळ मदतीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करूनही दखल घेतली गेली नव्हती. गेल्या वर्षी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन आढावा बैठकीतही याबाबत जाब विचारला होता. पण काहीच हालचाली झाल्या नव्हत्या. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही हा विषय गाजला. त्यानंतर निधी मिळाला.
पण आता वेगळीच समस्या समोर आली आहे. प्रशासनानेही धीम्या गतीने काम केल्याने ही स्थिती उद्भवली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी बॅंक खाते क्रमांकाची माहिती सादर केलेली नाही. त्यांनी ३१ जानेवारी २०१८ पर्यंत गाव कामगार तलाठी यांच्याकडे ती सादर करावी, असे सांगण्यात आले आहे.
जे शेतकरी मुदतीत माहिती देणार नाहीत, त्यांची रक्कम शासन जमा करण्यात येईल व त्यानंतर त्यांची कोणतीही तक्रार ग्राह्य मानली जाणार नाही. तसेच बॅंक खाते क्रमांकामुळे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्यास त्याला तेच जबाबदार असतील, अशी भूमिका उलट प्रशासनाने घेतली आहे. सर्वच तालुक्यात याच पद्धतीची परिस्थिती आहे. त्यामुळे अनुदान मिळण्यात अडचण झाली आहे.