शिक्षकाच्या नेमणुकीसाठी शाळेला कुलूप
जामनेर, जि. जळगाव : दुर्गम भागात जाण्यासाठी शिक्षकांची तयारी नसल्याने आठवडा उलटूनही जिल्हा परिषदेच्या चिंचोलीपिंप्री (ता. जामनेर) येथील शाळेला कुलूप कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
तालुक्यातील बहुतांश जिल्हा परिषद शाळांमधे शिक्षकांची कमतरता असल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः या सर्व शाळा दुर्गम (खेड्या-पाड्यांवरील) भागामधील आहेत. शिक्षकांना तेथे जायला त्रास होतो म्हणून नियुक्ती नको आहे. तालुक्यातील चिंचोलीपिंप्रीसह गोद्री, सोनारी आदी ठिकाणांच्या शाळेला तेथील पदाधिकाऱ्यांनी कुलूप लावले आहे. तसेच वरिष्ठांकडे शिक्षकांची लेखी मागणी केलेली आहे.
महिनाभरापूर्वी सोनारी उर्दू शाळेत शिक्षकाच्या मागणीसाठी लेखी निवेदन दिले होते, तर गोद्रीलाही अशाच प्रकारची तक्रार पुढे आली होती. शहरापासून जवळ असलेल्या शाळांमध्ये शिक्षक लागलीच नियुक्ती घेतात; परंतु दुर्गम भागात जाण्यासाठी ते इच्छुक नसतात. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.